रत्नागिरी : यंदा कोकणात पावसाने दमदार सुरुवात केली खरी; पण गेला आठवडाभर दडी मारली आहे. हवामान तज्ज्ञांचा अंदाज खरा होण्यासाठी दिवसाकाठी एक-दोन सरी पडतात; पण भाताच्या चिखलणी-लावणीसाठी त्या अजिबात पुरेशा नाहीत. निव्वळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेली शेती रखडली. पण, संगमेश्वर (जि. रत्नागिरी) तालुक्यातील राजवाडी येथे पाच एकरांवरील लावणीची कामे पाऊस नसतानाही सुरू झाली.
डोंगराच्या माथ्यावर खोदलेल्या शेततळ्याचे पाणी पाइपलाइनद्वारे शेतात आणले गेले आणि शेतीची कामे वेळापत्रकानुसार पार पडली. वर्षाकाठी दीडशे इंच पाऊस पडणाऱ्या कोकणात ‘जलव्यवस्थापन’ हा विषय अजून कोणी फार गंभीरपणे घेत नाही. पण गेल्या काही वर्षांतील बदलते हवामान इथले शेतीचे वेळापत्रक विस्कटून टाकत आहे. अशा परिस्थितीत कोकणी माणसाच्या कुटुंबाचं पोट भरणाऱ्या भातशेतीसाठी तरी गावाच्या पातळीवर अशी काही व्यवस्था होणं निकडीचं झालं आहे.
चार वर्षांपूर्वी राजवाडीचे माजी सरपंच संतोष भडवळकर यांच्या पुढाकाराने डोंगराच्या माथ्यावर ३० × ३० × ३ मीटरचे शेततळे खोदण्यात आले होते. त्यासाठी पाच लाख रुपयांचा खर्च आला. पुण्याच्या ॲलिकॉन कॅस्टलॉय -बासुरी फाउंडेशनने आर्थिक पाठबळ देत शेतकऱ्यांना बाराही महिने पाणी उपलब्ध करून देण्यात मोलाची भूमिका बजावली. या शेतात बहुतांशी सुवर्णा, सोनम या भात बियाण्याचा वापर केला जातो. घरी वापराबरोबरच या भाताला मागणीही आहे, असे येथील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
सुमारे पाऊण किलोमीटर अंतरावर डोंगरात हे तळे आहे. नैसर्गिक उतार असल्यामुळे पाणी थेट शेतात आणले आहे. पंपाची गरज नाही. या पाण्यावर पाऊस नसताना पाच एकर भात लागवड करणे शक्य झाले. - संतोष भडवळकर, शेतकरी, राजवाडी
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.