रत्नागिरी ः अचानक पडलेल्या पावसामुळे चिपळूण, संगमेश्वर तालुक्यातील कापलेल्या भात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत अजूनही कृषी विभागाकडून सर्व्हे झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.
चार दिवसांपूर्वी परिसरात कडक ऊन पडले होते. धुकेही पडत होते. पाऊस येणार नाही असे वाटत होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी भात कापणीस सुरुवात केली होती. दरम्यान, शुक्रवारी (ता. २) सायंकाळी या परिसरात जोरदार पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसाने तारांबळ उडाली. कापलेले भात भिजले. खाचरात पाणी साचल्याने भाताच्या लोंब्या भिजल्या. त्यानंतर शनिवारी आकाश ढगाळ होते. दुपारनंतर पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे शुक्रवारी कापलेले भात सुकवता आले नाही.
रविवारी सकाळपासूनच पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांना भिजलेल्या भाताकडे बघत राहण्याशिवाय पर्याय उरला नाही. असाच पाऊस पडत राहिल्यास जमिनीवर पडलेल्या भाताला मोड येऊन भात काळे पडण्याची भीती आहे. जमिनीवर पडलेले भात कुजणार आहे.
जुलैच्या अखेरीस आणि ऑगस्टच्या सुरुवातीला तालुक्यात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे ग्रामीण भागातील नद्यांना पूर आला होता. त्याचा फटका आसपासच्या शेतीला बसला. त्यावेळीही कृषी विभाग महसूल अधिकारी आणि ग्रामपंचायत ग्रामस्थांच्या ग्रामसेवकांमार्फत पंचनामे करण्यात आले होते. त्यानंतरची आर्थिक मदत अजूनही प्रक्रियेत आहे. असे असताना ऑक्टोबरमध्ये आलेल्या परतीच्या पावसामुळे भातशेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.
तालुक्यात चार हजार हेक्टर क्षेत्र भात लागवडीसाठी वापरले जाते. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात एकूण भातशेतीचे नुकसान ३० ते ४० टक्क्यांपर्यंत होते. आता उर्वरित भात शेतीपैकी ३० ते ४० टक्के भातशेती परतीच्या पावसामुळे धोक्यात आली आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षात भाताचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. - अनिल भिसे, प्रगतिशील शेतकरी, मालदोली
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.