रत्नागिरी : गतवर्षीच्या तुलनेत भात उत्पादनात ४५ टक्क्यांनी घट

गतवर्षीच्या तुलनेत भात उत्पादनात ४५ टक्क्यांनी घट
गतवर्षीच्या तुलनेत भात उत्पादनात ४५ टक्क्यांनी घट

रत्नागिरी ः अतिवृष्टीमुळे कोकणातील शेतकरी चांगलाच भरडला गेला आहे. शासनाकडून नुकसानीचे पंचनामेही झाले आहेत; परंतु त्यातून शेतकऱ्यांच्या हाती प्रत्यक्षात मिळणारी भरपाई अत्यल्पच राहणार असल्याचे चित्र आहे. कारण शासकीय पंचनामे आणि प्रत्यक्षात झालेले नुकसान यात मोठी तफावत असल्याचे एका खासगी सर्व्हेक्षणातून उघड झाले. काही शेतकऱ्यांच्या गतवर्षींच्या आणि यंदाच्या उत्पादनातील तफावत सुमारे ४५ टक्क्यांची आहे. त्यामुळे शासकीय पंचनाम्यांचा ठोकताळा निश्‍चितच शेतकऱ्यांसाठी अडचणीचा आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्‍वर तालुक्यातील राजवाडी, धामणी, चिखलीसह पाच गावांतील चौदा शेतकऱ्यांकडील भाताच्या उत्पादनाचा आढावा खासगीस्तरावर घेतला तर त्यातून वादळातील नुकसानीचे वास्तव पुढे आले आहे. लावणीपासून ते झोडणीपर्यंत झालेल्या खर्चाचा मेळ शेतीतील उत्पादनाशी घातला तर तो आतबट्ट्याचाच ठरतो. यंदा त्याहीपेक्षा गंभीर परिस्थिती रत्नागिरी, सिंधुदुर्गमधील शेतकऱ्यांवर आली आहे. 

भातझोडणीनंतर मिळालेल्या उत्पादनाचे आकडे धक्कादायक आहेत. त्यात वादळामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन सुमारे ४५ टक्क्यांनी घटल्याचे निदर्शनास आले. दरवर्षी त्या दहा शेतकऱ्यांना मिळून १२,१०० किलो भात उत्पादन होते. यंदा त्याच जमिनीत केलेल्या लागवडीतून अवघे ६,४५० किलो भात उत्पन्न झाले आहे. या गावातील शेती मळ्याची असून त्यांची जर अशी परिस्थिती असेल तर नदी किनारी भागातील शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत बिकट राहणार आहे. याकडे प्रशासन कोणत्या नजरेतून लक्ष देणार हे पाहणे आवश्यक आहे. 

शासकीय मदत ही हेक्टरी येणाऱ्या खर्चाच्या निकषावरुन दिली जाते. त्यामुळे ती हेक्टरी ६,८०० रुपये इतकी निश्‍चित केली आहे; मात्र त्यातून मिळणाऱ्या उत्पादनावर पाणी फेरले आहे. त्याचा विचार शासन करणार का? हा शेतकऱ्यांचा प्रश्‍न आहे. जिल्ह्यात १२ हजार हेक्टरवरील भातशेतीचे नुकसान झाल्याचे पंचनाम्यात दिसते; मात्र त्यातील उत्पादन किती याबाबत कोणतीच नोंद झालेली नाही. काढणीनंतर झोडणी केल्यावर आलेले उत्पादनाची माहिती घेतली तर नुकसानीचा आकडा मोठा असण्याची शक्यता आहे.

अतिपाऊस, कीड आणि जंगली श्वापदांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. भातझोडणीची कामे सुरू झाली असून उत्पादनावर झालेले परिणाम दिसू लागले आहेत. सध्याच्या स्थितीमध्ये चार एकर भातशेतीमधून पाच टन भात मिळते; परंतु यंदा साडेतीन टनच भात आम्हाला मिळाला. सुमारे दीड टन नुकसान सहन करावे लागले आहे. - प्रकाश रांजणे, शेतकरी, धामणी, ता. संगमेश्‍वर, जि. रत्नागिरी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com