अकोला ः खासगी व्यापाऱ्यांना कापूस विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना भावांतर योजनेअंतर्गत हमीभाव किमतीच्या फरकाची रक्कम द्यावी, अशी मागणी शेतकरी संघटनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. ‘लॉकडाउन’मुळे राज्य सहकारी कापूस उत्पादक महासंघ (फेडरेशन) आणि भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) यांची कापूस खरेदी तब्बल महिनाभरापासून बंद आहे.
जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणावर कापूस शिल्लक आहे. कापूस विक्रीसाठी जिल्ह्यातील जवळपास २७ हजार शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. नोंदणीची मुदत १० मे पर्यंत वाढवून देण्यात आली आहे. परंतु, अद्याप पणन महासंघाचे व सीसीआयचे बरेच कापूस खरेदी केंद्र सुरू झालेले नाहीत.
सध्या तापमानात वाढ झाली आहे. उष्णतेमुळे घरात कापूस ठेवणे धोकादायक बनू शकते. त्यातच खरेदीअभावी अडचणी वाढल्या आहेत. शासकीय खरेदी केंद्रावरील गर्दी कमी करण्यासाठी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांपैकी दररोज २० शेतकऱ्यांचा कापूस खरेदी केला जात आहे. यामुळे कापूस खरेदीची गती कमी आहे.
शेतकऱ्यांकडील सर्व कापूस खरेदी करण्यासाठी मोठा कालावधी लागू शकतो. त्यामुळे सर्व जिनिंगमध्ये कापूस खरेदी सुरू करावी. त्याद्वारे जास्तीतजास्त शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करावा. यापूर्वी अनेक शेतकऱ्यांनी खासगी व्यापाऱ्यांकडे कापूस विक्री केली आहे. यापुढेही खासगी व्यापाऱ्यांना कापूस विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना भावांतर योजना लागू करून हमीभावातील फरकाची रक्कम त्यांना द्यावी, अशी मागणी संघटनेचे विलास ताथोड, अविनाश नाकट, धनंजय मिश्रा व डॉ. निलेश पाटील यांनी केली आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.