माणसांना पाणी नाही, तिथं जनावरांसाठी आणावं कुठून? : शेतकऱ्यांची पत्रकार परिषद

माणसांना पाणी नाही, तिथं जनावरांसाठी आणावं कुठून?
माणसांना पाणी नाही, तिथं जनावरांसाठी आणावं कुठून?

औरंगाबाद ः ना विहिरीला पाणी, ना चारा अशा गंभीर स्थितीत पशुधन कसे जगवावे, या चिंतेने शेतकऱ्यांना ग्रासले आहे. जिथं माणसांनाच पिण्यासाठी पाणी नाही तिथं जनावरांना पिण्यासाठी मोठ्या प्रमाणात लागणारे पाणी आणावं तरी कुठून, असा सवाल पळशी शहर (ता. औरंगाबाद) येथील शेतकऱ्यांनी केला. विहिरींची खालावत चाललेली स्थिती तर जनावरांच्या चाऱ्याची टंचाई प्रत्यक्ष स्थिती दाखवत शासनाने तातडीने चारा छावणी सुरू करावी, अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली. 

आतापर्यंतचा सर्वाधिक भीषण दुष्काळ यंदा असल्याचं स्पष्ट करणाऱ्या पळशीच्या शेतकऱ्यांनी याविषयीची प्रत्यक्ष माहिती देण्यासाठी पळशी येथे शुक्रवारी (ता. ८) पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या वेळी त्यांनी पत्रकारांना गावशिवारातील चारा, पाणी व जनावरांच्या स्थितीची माहिती दिली. विहिरी कोरड्या पडल्या असून पाऊसच झाला नसल्याने शेततळी रिकामी आहेत. 

ओसाड पडलेल्या माळरानावर जनावरांना चरण्यासाठी गवताची काडी नाही. खरीप हातचा गेल्याने त्यावर असलेली जनावरांच्या चाऱ्याची आशा धुळीस मिळाली. दुसरीकडे अल्प झालेला पाऊस व पुरेशी ओल नसल्याने रब्बीकडूनही चाऱ्याची फारशी आशा नाही. आता बाहेरुन कडबा विकत आणावा तर त्यांच्या किंमती तीन हजार ते साडेतीन हजार रुपये प्रति शेकडा झाल्या. खर्च पेलणारा नसल्याने अशा स्थितीत जनावरे कशी जगावायची हा प्रश्न आहे. पशुधन जगले पाहिजे. त्यांचा आम्ही मुलांप्रमाणे सांभाळ करतो. मात्र जनावरांचे खपाटीला गेलेले पोट बघवत नाही. 

शेतातून काहीच हाती लागले नाही. आता कामेसुद्धा शिल्लक नाही. अशा स्थितीत शेतकऱ्यांच्या मुला-मुलींचे लग्न सुद्धा रखडत आहे. शेतकऱ्यांना या बिकट परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी चारा छावणी सुरू करणे आवश्‍यक असल्याचे मतं त्यांनी व्यक्त केली. या वेळी नानासाहेब पळसकर, संतोष काजळे, सुभाष लहाने, बाबासाहेब पळसकर, कचरू पळसकर, संजय पळसकर, राजेंद्र पळसकर, मन्सूर शहा, सोमीनाथ पळसकर, आसाराम शेळके यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती.

तहसीलदार, जिल्हाधिकारी कार्यालयाकडे चारा छावणी सुरू करण्याची मागणी केली होती. आता लेखी स्वरुपात मागणी करणार आहोत. पुढील तीन महिने अतिशय संकटाची असल्याने जनावरांना चाराच सोडा पाणीसुद्धा मिळणे अवघड होईल अशी स्थिती आहे.  - नानासाहेब पळसकर,  शेतकरी, पळशी, ता. औरंगाबाद.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com