इथेनॉलसाठी मान्यता; पण प्रकल्पांसाठी पैसा नाही

ethanol
ethanol

पुणे  : थेट साखरेपासून इथेनॉल तयार करण्यास केंद्र शासनाने मान्यता दिली असली तरी इथेनॉल प्रकल्प उभे करण्यासाठी देखील काही कारखान्यांकडे भांडवल नसल्याने नवा पेच तयार झाला आहे.  ३० हजार लिटर्स क्षमतेचा इथेनॉल प्रकल्प तयार करण्यासाठी किमान ५५ कोटी रुपये खर्च करावा लागतो. राज्यात असे ५५ कारखाने प्रकल्प उभारणी किंवा आधुनिकीकरणासाठी इच्छुक आहेत. मात्र अडचण पैशांची असल्याने धोरण असूनही कारखान्यांना फायदा होत नसल्याचे दिसते आहे.  साखर कारखान्यांना साखर तयार करून विकणे परवडत नसल्यामुळे कारखान्यांनी साखरेप्रमाणेच इथेनॉल निर्मितीवर भर द्यावा, असा धोरणात्मक निर्णय केंद्र सरकारने काही महिन्यांपूर्वी घेतला होता. मात्र देशात सध्या पडून असलेल्या साखरेपासून देखील इथेनॉल तयार करू द्या, अशी मागणी कारखान्यांनी केली होती. “कारखान्यांची ही मागणी देखील केंद्र शासनाने मान्य केली. तथापि, नुसती मागणी मान्य करून उपयोग नव्हता. त्यासाठी केंद्रीय साखर नियंत्रण नियम १९६६ मध्ये सुधारणा अत्यावश्यक होती. ही सुधारणा १९ नोव्हेंबरला केली गेली आहे. त्यानुसार आता साखर, ऊस रस आणि साखर अर्क या तीन घटकांपासून इथेनॉल करण्यास मान्यता मिळाली आहे,” अशी माहिती सूत्रांनी दिली.  आधी उसापासून साखर आणि पुन्हा या साखरेपासून इथेनॉल असा उलटा प्रवास आता कारखान्यांना करता येईल. मात्र त्यासाठी अत्यावश्यक असलेले आधुनिकीकरण किंवा नवा प्रकल्प उभारण्यासाठी कारखान्यांकडे स्वनिधी नाही. केंद्र शासनाने बॅंकांचे वित्तीय सहाय कारखान्यांना मिळवून देण्याचे ठरविले असले तरी त्यातून फक्त ७० टक्के खर्च भागवता येतो. उर्वरित ३० टक्के निधी हा कारखान्यांनी टाकावा, असे गृहीत धरले आहे.  “कारखान्यांकडे सध्या ३० टक्के सोडाच, पण दहा टक्केदेखील निधी नाही. एका बॅंकेला केवळ ७० टक्के अर्थसाह्य देणे शक्य होते. त्यामुळे दोन बॅंकांनी एकत्र येऊन एका बॅंकेने ५० टक्के व दुसऱ्या बॅंकेने ४० टक्के असा ९० टक्के भांडवली पुरवठा करावा, असा पर्याय सुचविला जात आहे. ते शक्य नसल्यास बॅंकेने ७० टक्के, कारखान्याने १० टक्के आणि उर्वरित २० टक्के निधी राज्य शासनाने टाकावा, असा दुसरा पर्याय आहे. तथापि, हा तिढा अजून सुटलेला नाही,” अशी माहिती सूत्रांनी दिली.  ६०० लिटर इथेनॉल मिळणे शक्य राज्यात पडून असलेल्या साखर साठ्याला इथेनॉल हा चांगला पर्याय आहे. केंद्राच्या निर्णयामुळे एक टन साखरेपासून ६०० लिटर इथेनॉल तयार करणे शक्य आहे, असे कारखान्यांचे मत आहे. उसाच्या रसापासून थेट इथेनॉल करण्यास देखील मान्यता मिळाल्याने ११ टक्के रिकव्हरीला प्रतिटन उसापासून ७० लिटर इथेनॉल मिळू शकेल. सध्या बहुतेक कारखाने सी-हेव्ही मोलॅसिसपासून इथेनॉल मिळवतात. त्यात प्रतिटन मोलॅसिसपासून २५० ते २५५ लिटर इथेनॉल हाती येते. बी-हेव्हीला मान्यता मिळाल्याने हेच प्रमाण आता ३०० ते ३१० लिटरपर्यंत जाईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com