यवतमाळ जिल्ह्यात फवारणी विषबाधा मृत्युदर शून्यावर

फवारणी दरम्यान विषबाधेमुळे तीन वर्षांपूर्वी राज्यात सर्वाधिक २२ मृत्यूची नोंद जिल्ह्यात झाली होती.
pesticide spraying
pesticide spraying

यवतमाळ : फवारणी दरम्यान विषबाधेमुळे तीन वर्षांपूर्वी राज्यात सर्वाधिक २२ मृत्यूची नोंद जिल्ह्यात झाली होती. त्यानंतरच्या काळात कृषी विभागाने राबविलेल्या सुरक्षित फवारणी जनजागृती अभियानातून हा मृत्यूदर शून्यावर आणण्यात यश मिळाले आहे. 

भौगोलिकदृष्ट्या सर्वांत मोठ्या असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात कापसाचे क्षेत्र पाच लाख हेक्‍टर आहे. त्यामुळेच कॉटन सिटी म्हणून देखील यवतमाळला ओळखले जाते. २०१७ मध्ये जिल्ह्यात कापसावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला होता. जिल्ह्यात पहिल्यांदाच कापसावर बोंडअळी आली होती. त्यामुळे या किडीचे नियंत्रण कसे करावे याविषयीची माहिती नसल्याने शेतकऱ्यांनी अनेक कीटकनाशकांची एकत्रित फवारणी केली. ही कीटकनाशक कापसा करता शिफारशीत आहेत किंवा नाही हे देखील दुर्लक्षित करण्यात आले. यामुळे बोंडअळीचे नियंत्रण तर दूरच परंतु त्याचा विपरीत परिणाम फवारणी करणाऱ्या शेतकरी,  शेतमजुरांच्या मानवी आरोग्यावर झाला. जिल्हाभरात १०७५ शेतकरी-शेतमजूर फवारणी दरम्यान विषबाधेमुळे बाधित झाले. त्यामुळे जिल्हाभरात एकच हाहाकार उडाला होता. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी बाधित शेतकरी शेतमजुरांची रीघ लागली. आरोग्य यंत्रणा देखील किटकनाशकांमुळे होणाऱ्या विषबाधेवरील उपचारांपासून अनभिज्ञ होती. त्यामुळे गोंधळात आणखीच भर पडली.  

सामाजिक संस्थांनी या प्रकाराचा विरोध म्हणून मोर्चे काढले,  आंदोलनं केली. त्याची दखल घेत तत्कालीन कृषी सचिव विजयकुमार, तत्कालीन कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सर्वांना यवतमाळमध्ये धाव घ्यावी लागली होती. त्याचवेळी राज्य शासनाकडून या प्रकाराच्या चौकशीसाठी तत्कालीन गुणनियंत्रण संचालक अशोक लोखंडे यांच्या नेतृत्वात एक समिती गठित करण्यात आली. या समितीने आपला सविस्तर अहवाल देखील सादर केला आहे. 

दरम्यान, यापुढील काळात अशा प्रकारांवर नियंत्रण मिळावे याकरिता कृषी विभागाने व्यापक जनजागृती अभियान हाती घेतले. त्याच्या परिणामी जिल्ह्यात फवारणी दरम्यान होणाऱ्या विषबाधांच्या घटनांवर नियंत्रण मिळविता आले आहे. मृत्युदर तर शून्यावर आला आहे.  फवारणी दरम्यान विषबाधा

वर्ष बाधित मृत्यू 
२०१७ १०७५ २२
२०१८ ३३५ ००
२०१९ १९० ००
२०२० ६१ ००

प्रतिक्रिया जिल्ह्यात २०१७ मध्ये कापसावरील बोंड आळी नियंत्रण करताना कीटकनाशकांची एकत्रित फवारणी करण्यात आली. त्याचे दुष्परिणाम विषबाधा आणि शेतकरी शेतमजुरांच्या मृत्यूच्या माध्यमातून समोर आले. यावर नियंत्रणासाठी सुरक्षित फवारणी जनजागृती अभियान २०१८ पासून राबविण्यात येत आहे या माध्यमातून विषबाधांच्या टनांवर बऱ्याच अंशी नियंत्रण मिळविता आले आहे. मृत्युदर तर शून्यावर आला आहे.  - नवनाथ कोळपकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, यवतमाळ.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com