सिंधुदुर्ग : नेटवर्कसह इतर अनेक समस्यांमुळे जिल्ह्यातील अनेक शेतकरी पीकपेरा नोंद करू शकलेले नाहीत. त्यामुळे या वर्षी भातविक्री करताना शेतकऱ्यांना अडचण निर्माण होणार आहेत. त्यामुळे ही पीक नोंदची अट शिथील करावी, अशी मागणी सावंतवाडी तालुका खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष अरुण गावडे यांनी शासनाकडे केली आहे. शासनाने या वर्षी पीकपेरा नोंद मोहीम राबविली. या मोहिमेअंतर्गत जमिनीत असलेल्या पीकाची नोंदणी शेतकऱ्यांनी स्वतःच करावयाची होती. परंतु जिल्ह्यातील हजारो शेतकरी पीकपेरा नोंदणी करू शकलेले नाहीत. यामध्ये अधिकतर भात उत्पादक शेतकऱ्यांचा समावेश आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भात उत्पादन होते. गेल्या वर्षी ८२ हजार क्विंटल भात विक्री शेतकऱ्यांनी केली होती. परंतु या वर्षी ज्या शेतकऱ्यांनी सात-बारावर भात पिकांची नोंद केली आहे. त्याच शेतकऱ्यांना भात विक्री करता येणार आहे. त्यामुळे अनेक शेतकरी भातविक्रीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. या वर्षीचा भात खरेदी-विक्री हंगाम नोव्हेंबरमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. शासनाने पीकपेरा नोंदी अट शिथील न केल्यास अनेक शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे शासनाने ही अट शिथिल करावी, अशी मागणी गावडे यांनी शासनाकडे केली आहे. खेडोपाड्यात अजूनही नेटवर्कची मोठी समस्या आहे. पिकाचा फोटो ऑनलाइन घ्यावा लागतो. नेटवर्क नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना नोंद करता आलेली नाही. त्यामुळे शासनाने घातलेली जाचक अट रद्द करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.