बियाणे, खते बांधावर देण्याचे नियोजन करा

कृषी सेवा केंद्रांवर शेतकऱ्यांची होणारी गर्दी टाळण्यासाठी आतापासूनच नियोजन करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना बांधावरच बियाणे, खते देण्याचे नियोजन करावे, अशी सूचना जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी केली.
Plan to give seeds, fertilizers on the dam
Plan to give seeds, fertilizers on the dam

वाशीम : आगामी खरीप हंगामाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील सर्व कृषी सेवा केंद्र सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत उघडण्यास मुभा देण्यात आली आहे. मात्र मे अखेरीस किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात कृषी सेवा केंद्रांवर शेतकऱ्यांची होणारी गर्दी टाळण्यासाठी आतापासूनच नियोजन करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना बांधावरच बियाणे, खते देण्याचे नियोजन करावे, अशी सूचना जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी केली.

जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी बुधवारी (ता. ५) दुरदृश्‍य प्रणालीद्वारे तालुकास्तरीय अधिकाऱ्यांसोबत संवाद साधला. आगामी हंगामात शेतकऱ्यांना बांधावर खते, बियाणे मिळण्यासाठी तहसीलदार, गटविकास अधिकारी व तालुका कृषी अधिकाऱ्यांनी तालुकास्तरावर संयुक्त बैठक तातडीने घ्यावी. यामध्ये खते, बियाणे वितरणाचे नियोजन करावे. कुठल्याही परिस्थितीत कृषी केंद्रावर गर्दी होणार नाही, याची खबरदारी घेण्याचे निर्देशही दिले.

कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी गर्दी टाळणे आवश्यक असून, याकरिता जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संचारबंदी नियमांची शहरी व ग्रामीण भागात काटेकोरपणे अंमलबजावणी आवश्यक आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देशही षण्मुगराजन एस यांनी दिले. एखाद्या गावामध्ये गर्दी होणारा कार्यक्रम घेतल्यास संबंधितांवर कारवाई केली जावी. कारवाई होत नसेल, तर संबंधित गावस्तरीय कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारासुद्धा त्यांनी दिला.

जिल्ह्यातील काही गावांमध्ये अजूनही लग्न समारंभ, अंत्यसंस्कार प्रसंगी गर्दी होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व ग्रामस्तरीय समित्या, गावस्तरीय कर्मचारी यांनी अधिक सतर्क राहून गर्दी होणारे कार्यक्रम आयोजित केले जाणार नाहीत, याची दक्षता घेणे आवश्यक आहे. तसेच कोणीही असा कार्यक्रम आयोजित केल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्याचे निर्देश दिले.

निवासी उपजिल्हाधिकारी श्री. हिंगे म्हणाले, की बँक आणि एटीएमच्या वेळांमध्ये बदल करण्यात आला असून, आता बँक सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत, तर एटीएम सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. या कालावधीत बँकांमध्ये ग्राहकांची गर्दी होऊ नये, यासाठी उपाययोजना कराव्यात, असे त्यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com