यवतमाळ ः घाटंजी तालुका कृषी विभागाने यावर्षी खरिपात सुमारे ६३ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन केले आहे. यातील सुमारे ४३ हजार हेक्टरवर कापूस राहील, अशी माहिती सूत्रांनी दिली.
यवतमाळ जिल्ह्यात सिंचनाचा अभाव असल्याने शेतकऱ्यांची भिस्त पावसाच्या पाण्यावरच राहते. जिल्ह्यात सुमारे ४.५० लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड होते. गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कृषी विभागाने धूळपेरणी टाळण्याचे आवाहन केले आहे. घाटंजी तालुक्यात ९५ हजार ८३० हेक्टर सर्वसाधारण भौगोलिक क्षेत्र आहे. त्यापैकी ६३ हजार ५५० हेक्टर क्षेत्र लागवडीयोग्य आहे. यावर्षी खरिपात ४३ हजार ९५९ हेक्टरवर कापूस, नऊ हजार ५४७ हेक्टरवर सोयाबीन, सात हजार ८१० हेक्टरवर तूर तर दोन हजार २३४ हेक्टरवर इतर पिकांची लागवड होईल, असा अंदाज आहे. त्यानुसार कृषी विभागाने बियाणे व खतांचे नियोजन केले आहे.
लागवडीसाठी कापूस बियाण्यांची एक लाख ९७ हजार ८६० पाकिटांची गरज आहे. सोयाबीनचे सात हजार १६० क्विंटल तर तुरीच्या एक हजार १५ क्विंटल बियाण्यांची आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे चार हजार ५२० टन युरिया, एक हजार २३० टन डीएपी, एमओपी ९१० टन, एसएसपी १२५० टन, संयुक्त खते तीन हजार ९७० टन तर इतर मिश्रखते एक हजार ५६० टन लागणार आहेत.
घाटंजी तालुक्यात एकूण १३ हजार ४४० टन खते लागणार आहे. सध्या दोन हजार ४५८ टन खत उपलब्ध असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. तालुक्याचे महत्त्वाचे पीक कापूस आहे. परंतू बोंडअळी नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी धूळपेरणी टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
१२० शेतकऱ्यांना पास कृषी विभागाकडून घाटंजी तालुक्यातील १२० शेतकऱ्यांना अत्यावश्यक पास देण्यात आली आहे. त्या माध्यमातून भाजीपाला, फळे व इतर शेतमालाची विक्री त्यांना करता आली.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.