सातारा जिल्ह्यात होणार सव्वा कोटी रोपांची लागवड

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सातारा : राज्य शासनाने यंदा ३३ कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्टपूर्तीसाठी कृती आराखडा तयार केला आहे. त्यामध्ये सातारा जिल्ह्यास एक कोटी २४ लाख वृक्ष लागवडीचे लक्ष्य दिले आहे. तीन महिन्यांपर्यंत ही मोहीम चालणार आहे. या वेळी वृक्षलागवड मोहिमेचे ड्रोन शूटिंग, स्पॉट फोटोग्राफी केली जाणार आहे. त्यामुळे वृक्षारोपण मोहिमेत पारदर्शकता वाढीस मदत होणार आहे. 

राज्य सरकारने ५० कोटी वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गत पहिल्या टप्प्यात चार कोटी, दुसऱ्या टप्प्यात १३ कोटींची वृक्षलागवड केली. त्यानंतर आता तिसऱ्या टप्प्यात ३३ कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ठ ठेवले आहे. एक जुलै ते ३० सप्टेंबर या काळात वृक्षलागवड कार्यक्रमाचा बिगूल वाजणार आहे. ही वृक्षलागवड जनचळवळ होण्याच्या अनुषंगाने शासनाचे प्रयत्न सुरू आहे. वनविभाग, सामाजिक वनीकरण आणि इतर शासकीय, प्रशासकीय यंत्रणांच्या सहकार्याने ही वृक्षलागवड कार्यक्रम राबविला जात आहे. त्याकरिता जिल्हानिहाय वृक्षलागवडीचे उद्दिष्ट निश्‍चित केले आहे.

जिल्हाधिकारी, उपवनसंरक्षक यांच्याकडे या मोहिमेची विशेषत्ववाने धुरा सोपविली आहे. रोपे जगविणे, रोपांची ऑनलाइन मागणी नोंदविणे, यंत्रणेला रोपे पुरविणे, वृक्षलागवडीसाठी जागेची तरतूद करणे आदी बाबी पूर्ण कराव्या लागणार आहेत. या वेळी रेशीम उद्योग विभागाच्या जागेवर वृक्षलागवडीचे नियोजन केले आहे. 

जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी याबाबत नुकताच आढावा घेऊन वृक्षलागवडीच्या उद्दिष्टानुसार खड्डे काढण्याचे सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. वृक्षारोपण कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी लोकसहभाग वाढवा, असेही त्यांनी सूचित केले. 

अशी आहेत उद्दिष्टे  जिल्ह्यातील जवळपास ५० प्रशासकीय विभागांना वृक्षारोपणाचे उद्दिष्ठ दिले आहेत. त्यामध्ये ग्रामपंचायत विभागाला ४७ लाख ८८ हजार ७००, वन विभागाला ३८ लाख २४ हजार, सामाजिक वनिकरण विभागाला २२ लाख, कृषी विभागाला चार लाख ९६ हजार ८५०, एमआयडीसी कार्यालयास ५५ हजार ६००, जलसंपदा विभागाला २१ हजार ८५०, शिक्षण विभागाला ४६ हजार ६५०, रेशीम उद्योग विभागाला सात लाख २६ हजार १५० रोपांच्या लागवडीचे लक्ष्य दिले आहे. 

खड्डे घेण्यात वनविभाग मागे  उद्दिष्टपूर्तीसाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांकडून सातत्याने त्याचा आढावा घेतला जात आहे. ग्रामपंचायत विभागाने ३७ लाख दोन हजार ७८६ खड्डे घेतले आहेत. मात्र वन विभागाने आजवर १९ लाख, तर सामाजिक वनीकरणने १७ लाख खड्डे खोदले आहेत. वन विभाग तसेच औद्योगिक विभाग, जलसंपदा विभागही खड्डे घेण्यात मागे असल्याचे दिसून येत आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com