वाशीम : जिल्ह्यात निर्माण होणारी संभाव्य पाणीटंचाई पाहता पाणीटंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. जिल्ह्यात सुमारे ५१0 गावे पाणीटंचाईग्रस्त असून, या गावांमध्ये ५७८ उपाययोजना आखण्यात आल्या आहे. यासाठी ४ कोटी ४८ लाख ५३ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे.
कमी पावसामुळे यावर्षी जिल्ह्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढत आहे. डिसेंबरमध्ये ५१० गावांसाठी आराखडा तयार करण्यात आला. यात टंचाई निवारणाच्या ५७८ उपाययोजना आखण्यात आल्या. त्यासाठी ४ कोटी ४८ लाख ५३ हजार रुपये खर्च केला जाणार आहे.
२०१७ मध्ये २५२ गावांमध्ये उपाययोजनांसाठी २.१७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. यंदा मात्र यात मोठी वाढ झाली. डिसेंबरमध्येच प्रशासनाला पाणीटंचाई निवारणार्थ ५७८ उपाययोजनांची आखणी करावी लागली. निधीसुद्धा दुप्पट म्हणजे ४ कोटी ४८ लाख ५३ हजार रुपये लागणार आहे.
पाणीटंचाई कृती आराखड्यानुसार जिल्ह्यातील ४९१ विहिरींचे अधिग्रहण करण्यात येणार असून, त्याद्वारे पाणी पुरविण्यात येईल.मंगरूळपीर, मालेगाव तालुक्यात तीव्र पाणीटंचाई आहे. जिल्ह्यातील पाणीटंचाईग्रस्त गावांपैकी ७४ गावांना टँकर अथवा बैलगाडीने पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्यासाठी १ कोटी ९१ लाख रुपयांचा निधी ठेवण्यात आला आहे.