नगरसूलला २२ विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा

नगरसूलला २२ विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा
नगरसूलला २२ विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा

नाशिक : येवला तालुक्यातील नगरसूलजवळील दाद मळा येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारातून विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. शाळेत दूध, खिचडी याचे सेवन विद्यार्थ्यांनी केले होते. त्यानंतर जवळपास दोन तासांनंतर विद्यार्थी घरी आल्यानंतर त्यांना अचानक चक्कर, मळमळ आणि उलट्यांचा त्रास सुरू झाला. या घटनेनंतर नगरसूल येथील ग्रामीण रुग्णालयात २२ विद्यार्थ्यांना दाखल करण्यात आले आहे.

नगरसूल गावात दाद मळा येथे जिल्हा परिषदेची पहिली ते चौथी पर्यंतचे चार वर्ग भरतात. येथील विद्यार्थ्यांची पटसंख्या २७ इतकी आहे. शनिवार (ता. ६) सकाळी नऊ वाजेच्या सुमारास शाळेतील विद्यार्थ्यांनी दूध व नंतर खिचडीचा अल्पोपहार घेतला. या दिवशी शाळा सकाळी सत्रात असलेल्याने सकाळी साडेअकरा वाजता सुटी झाल्यानंतर विद्यार्थी घराकडे परतले. यातील अनेक विद्यार्थ्यांना चक्कर, मळमळ व उलट्यांचा त्रास होऊ लागल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊन त्यांची धावपळ उडाली. या घटनेनंतर विद्यार्थ्यांना नगरसूल ग्रामीण रुग्णालयात दुपारी बारा वाजता उपचारासाठी दाखल करण्यात आले. सुरवातीला दोन विद्यार्थ्यांना दाखल केले नंतर सायंकाळी चार वाजेपर्यंत ही संख्या २२ वर गेली. शाळेतील हे विद्यार्थी आठ ते दहा वर्षे या वयोगटातील आहेत.

रुग्णालयात दाखल केल्यानंतर वैद्यकीय अधीक्षक डॉ. सतीश सूर्यवंशी व कर्मचाऱ्यांनी तातडीने उपचार सुरू केले. घटनेची माहिती मिळताच सावरगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश कांबळे, आरोग्यसेवक एन. डी. तिरसे यांच्यासह आरोग्य सहायक सोनकुसरे आदींनी नगरसूलकडे धाव घेतली. उपचारासाठी मदत केली. विद्यार्थ्यांना उपचार घेतल्यानंतर परिस्थितीत सुधारणा झाली आहे.

रविवार (ता. ७) डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना फळे व आहार दिल्याचे सांगण्यात आले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांची तपासणी केली. जिल्हा आरोग्य विभागाने वेळीच उपचार केल्याने विद्यार्थ्यांच्या परिस्थितीत सुधारणा झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना रुग्णालयातून सोडून देणार असल्याची माहिती डॉ. सुरेश जगदाळे यांनी दिली. 

शालेय आहाराची अन्न सुरक्षा टांगणीवर, चौकशीसाठी आहार नमुने ताब्यात जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयामार्फत पथकाने शाळेतील घटनास्थळी जाऊन तातडीने पंचनामा केला. या ठिकाणी खिचडी व दूध हे शालेय पोषण आहाराचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले आहेत. या अन्नाचे नमुने अन्न व औषधे प्रशासन विभागाकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी खिचडी व दूध घेतले, त्यांनाच विषबाधा झाली मात्र ज्यांनी दूध प्यायले नाही, त्यांना विषबाधा झाली नसल्याचे समजते. त्यामुळे ही विषबाधा दुधातून झाली का? हे तपासाअंती समोर येईल. मात्र, या घटनेमुळे अन्न व सुरक्षा टांगणीवर असल्याचे समोर आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com