शेतकऱ्यांच्या रॅलीबाबतचा निर्णय पोलिसांनीच घ्यावा : सर्वोच्च न्यायालय

विविध शेतकरी संघटनांकडून प्रजासत्ताक दिनी काढल्या जाणाऱ्या प्रस्तावित ट्रॅक्टर रॅलीबाबत सर्वोच्च न्यायालयाने सावध भूमिका घेतली आहे.
Supreme-Court
Supreme-Court

नवी दिल्ली ः विविध शेतकरी संघटनांकडून प्रजासत्ताक दिनी काढल्या जाणाऱ्या प्रस्तावित ट्रॅक्टर रॅलीबाबत सर्वोच्च न्यायालयाने सावध भूमिका घेतली आहे. रॅलीचा विषय हा कायदा आणि सुव्यवस्थेचा एक भाग असून याबाबत निर्णय घेण्याचा पहिला अधिकार हा दिल्ली पोलिसांना असून राजधानीमध्ये कोणाला येऊ द्यायचे आणि कोणाला नाही, याचा निर्णय पोलिसांनीच घ्यावा, असे न्यायालयाने सोमवारी (ता.१८) स्पष्ट केले. दरम्यान, ‘‘शांततेच्या मार्गाने ट्रॅक्टर रॅली काढण्याचा घटनात्मक अधिकार आम्हाला आहे,’’ असे म्हणत शेतकरी नेते रॅलीवर ठाम आहेत. 

शेतकऱ्यांच्या प्रस्तावित रॅलीला रोखण्याबरोबरच राजधानी क्षेत्रामध्ये अन्य आंदोलनेही होऊ नये म्हणून म्हणून केंद्र सरकारने न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सोमवारी सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर सुनावणी झाली. हा मुद्दा हाताळण्याची जबाबदारी ही सर्वस्वी पोलिसांची असल्याचे ते म्हणाले. पोलिसांनी नेमके काय करायचे आणि त्यांची जबाबदारी नेमकी काय आहे, हे आम्ही सांगणार नाही, असे स्पष्ट करताना न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी २० जानेवारीपर्यंत पुढे ढकलली आहे. शेतकरी नेते रॅलीवर ठाम असून, या रॅलीनंतर शेतकरी शांतपणे आंदोलनस्थळी परततील असेही अखिल भारतीय किसान सभेचे पंजाबचे उपाध्यक्ष लखबीर सिंग यांनी सांगितले. शेतकऱ्यांना शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचा पूर्ण अधिकार असल्याचे भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष जोगिंदरसिंग उग्राहान यांनी नमूद केले.

दिल्ली पोलिसांकडून याचिका  आतापुरते आम्ही या प्रकरणाच्या सुनावणीला स्थगिती देत आहोत पण याबाबत नेमका काय निर्णय घ्यायचा हे ठरविण्याची जबाबदारी ही सर्वस्वी तुमची असल्याचे न्यायालयाने ॲटर्नी जनरल यांना सांगितले. केंद्राने याप्रकरणी दिल्ली पोलिसांकडून याचिका सादर केली होती. या आंदोलनामुळे प्रजासत्ताक दिनी आयोजित कार्यक्रमात व्यत्यय येऊ शकतो, असे या याचिकेमध्ये नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी आम्ही सर्वांची बाजू ऐकून घेणार आहोत असे सरन्यायाधीशांनी स्पष्ट केले. आजच्या सुनावणीवेळी ज्येष्ठ विधिज्ञ दुष्यंत दवे, ए.पी.सिंह यांनी शेतकरी संघटनांची बाजू मांडली.   शेतकरी नेते रॅलीवर ठाम  ‘‘शेतकऱ्यांचे आंदोलन हे काही राजपथावर होणार नाही. दिल्लीच्या बाहेर रिंग रोडवर हा मोर्चा काढण्यात येईल. प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये व्यत्यय आणण्याचा आमचा हेतू नाही. आम्हाला दिल्लीच्या सीमांवर रोखण्यात आल्याने येथे थांबलो आहोत. कायदा-सुव्यवस्था कायम ठेवूनच आम्ही ही रॅली काढणार आहोत,’’ अशी माहिती भारतीय किसान युनियनचे (लाखोवाल) सरचिटणीस परमजितसिंग यांनी दिली.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com