सांगली : डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांची मृग बहार धरण्यासाठी छाटणी, चाचरणे आणि अंतर्गत मशागतीची कामे जोमात चालू झाली आहे. आटपाडी तालुक्यात डाळिंबाचे १५ हजार हेक्टर क्षेत्र आहे. गतवर्षीमध्ये अतिवृष्टीमुळे बागांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे अंदाजे चार ते पाच हजार हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये आंबे बहार धरला आहे. उर्वरित शेतकऱ्यांनी मृग बहार धरण्यासाठी पूर्व तयारी चालू केली आहे.
डाळिंबाची छाटणी सुरू केली असून वेग आला आहे. छाटणीसाठी सोलापूर जिल्ह्यातील बलवडी, कोळा, नागज या भागातील मजूर गाड्या करून मोठ्या संख्येने तालुक्यात येऊ लागलेत. सध्या भागांचे पाणी बंद करून ताणावर सोडल्या आहेत. छाटणीनंतर बागेतील कचरा बाहेर काढणे, झाडाच्या खोडांना पेस्ट लावणे, चाचरणे, शेण व वरखाते आणि बेड करण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. दोन महिन्यात कामे करण्याचे नियोजन आहे. छाटणी करून बोर्डोची फवारणी केली जाते.
उन्हाच्या कडाक्यामुळे कामाची वेळ बदलली उन्हाचा कडाका वाढू लागल्यामुळे छाटणी मजुरांनी कामाच्या वेळा बदलल्या आहेत. पहिल्या सत्रात सकाळी सहा ते अकरा, अशी वेळ ठेवली आहे. त्यासाठी चारशे रुपये मजुरी दर आहे. दुपारच्या सत्रात तीन ते सायंकाळी सहा वेळात छाटणी केली जाते. त्यासाठी अडीचशे रुपये मजुरी दर आहे. अशीच कामाची वेळ शेणखत घालणाऱ्या मजुरांनी केली आहे. शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनीही बागांतील कामाच्या वेळा बदलल्या आहेत.
शेणखताला सोन्याचा भाव तालुक्यात फळबागांचे क्षेत्र वाढत चालले आहे. त्यामुळे शेणखताचा तुटवडा जाणवू लागला आहे. परिणामी एका टॅक्टरच्या ट्रॉलीचा भाव आठ हजारांवर पोहोचला आहे. तसेच सोलापूर जिल्ह्यातील अकलूज परिसरातून रोज पाच-पंचवीस ट्रॅक्टर शेणखत विक्रीसाठी आटपाडीत येऊ लागले आहे. ग्रामपंचायत परिसरामध्ये शेणखत ट्रॅक्टर विक्रीसाठी उभा असतात. तेथून शेतकरी खरेदी करून बागेमध्ये घेऊन जातात.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.