हातातोंडाशी आलेल्या डाळिंबावर पाणी 

साडेतीन एकरातील डाळिंबाचा शंभर रुपये प्रति किलो असा दर ठरला होता. सुमारे आठ ते नऊ टन डाळिंबाच उत्पादन हाती लागणार होतं, आठ ते साडे आठ लाख रुपये पहिल्या तोड्याला मिळणार होते.
pomegranate crop
pomegranate crop

सांगली ः साडेतीन एकरातील डाळिंबाचा शंभर रुपये प्रति किलो असा दर ठरला होता. सुमारे आठ ते नऊ टन डाळिंबाच उत्पादन हाती लागणार होतं, आठ ते साडे आठ लाख रुपये पहिल्या तोड्याला मिळणार होते. बुधवारी (ता.१४) सकाळी व्यापारी डाळिंबाची काढणी सुरु करणार होते. पण पहाटेच पाऊस पावसाने थैमान घातले. शेतात गुडघ्या इतके पाणी साचले अन्‌ डाळिंब काढायचं थांबलं. आता दोन टनाने उत्पादनात घट होण्याची शक्यता असून फळ कुजव्यानं दरही कमी मिळण्याची भीती आहे, असे गोमेवाडी (ता. आटपाडी) येथील शेतकरी लक्ष्मीकांत देशपाडे सांगत होते. 

साडेतीन एकरावर सुमारे एक हजार पन्नास डाळिंबाची झाडं. अगोदरच डाळिंबावर संकटाची मालिका सुरु आहे. त्यातूनही डाळिंबाचा मृग बहार धरला. बाग चांगली फुलली. सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात वातावरणात बदल झाला, पाऊस सुरु झाला. त्यामुळे फूल, कळी गळ होऊ लागली. तेलकट डाग रोगाचा प्रादुर्भाव झाला. सुमारे पाच वेळा फळ कुज झालेली दोन ते तीन टन डाळिंब काढून टाकली. त्यातूनही बाग चांगली जोपासली. फळ मोठी झाली. डाळिंब विक्री करण्याचे नियोजन सुरु केले. 

मंगळवारी (ता. १३) व्यापारी शेतात आले. डाळिंबाची पाहणी केली. डाळिंबाचा दर्जा पाहून त्यास प्रति किलोस शंभर रुपये असा दर ठरवला. बुधवारपासून डाळिंबाची काढणी करतो असे सांगून व्यापारी निघून गेले. सुमारे साडेतीन एकरातून आठ ते नऊ टन डाळिंबाचे उत्पादन मिळेल, असा ठाम विश्‍वास होता. या दरानुसार आठ ते नऊ लाख रुपये हाती येतील. पैसे हाती आल्यानंतर शेतीच नियोजन करायचं असं मनात पक्क केलं होतं. 

पण, बुधवारी पहाटेपासून पावसाला सुरवात झाली. बघता बघता दोन दिवस मुसळधार पाऊस पडू लागला. शेतात गुघडाभर पाणी साचल. आता काय करायचं असा प्रश्‍न पडला होता. तशाच पावसात सहा किलोमीटरचा पल्ला गाठून मुलांना घेऊन शेतात गेलो. बांध फोडले, पाईप टाकून पाणी काढण्याचा प्रयत्न करु लागलो. पण शेतातील पाणी कमी होत नव्हतं. शेतात तीन दिवसांपासून पाणी आहे. पाणी जास्त असल्यानं डाळिंब पाण्यात बुडाले. त्यामुळे विक्रीला आलेल्या डाळिंबाला फळकुज होणार असल्याने डाळिंबाच्या उत्पादनात दोन टन घट होण्याचा अंदाज आहे. व्यापारी पुन्हा येऊन गेले, त्यावेळी ८० रुपये प्रति किलो दर असा सांगितला. पण शेतात अजूनही पाणी असून ते कमी होण्यास तीन ते चार दिवस जातील. पुन्हा दर खाली येतील की काय? अशी भीती निर्माण झाली आहे.  प्रतिक्रिया अगोदर दुष्काळाने पिचलो. त्यातून मार्ग काढत डाळिंबाची बाग जगवली. पण निर्सगापुढं हतबल झालो आहे. पावसानं विक्रीला आलेल्या डाळिंबाच लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. हे नुकसान कसे भरून काढायचे?  - लक्ष्मीकांत देशपांडे, गोमेवाडी, ता. आटपाडी. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com