डाळिंब लागवड घटली 

कोरडवाहू पट्ट्यातील शेतकऱ्यांना आर्थिक सुबत्ता देणारे पीक म्हणून डाळिंबाची ओळख आहे. राज्यात दर वर्षी सुमारे दहा हजार हेक्टरवर नवीन डाळिंब लागवड होते.
Pomegranate cultivation declined
Pomegranate cultivation declined

सांगली ः कोरडवाहू पट्ट्यातील शेतकऱ्यांना आर्थिक सुबत्ता देणारे पीक म्हणून डाळिंबाची ओळख आहे. राज्यात दर वर्षी सुमारे दहा हजार हेक्टरवर नवीन डाळिंब लागवड होते. मात्र, राज्यात गेल्या तीन ते चार वर्षांत अतिवृष्टीचा फटका डाळिंब पिकाला बसल्याने नव्याने होणाऱ्या लागवडीवर परिणाम झाला आहे. लागवडीचा वेग मंदावला आहे. मागील वर्षी (२०२१) सरासरीच्या तुलनेत अवघी पाच टक्केच म्हणजे दोन हजार हेक्टरवर लागवड झाली असल्याची अशी माहिती अखिल भारतीय डाळिंब संघाच्या सूत्रांनी दिली.  राज्यात सुमारे १ लाख ७० हजार हेक्टरवर डाळिंब पीक आहे. देशात सर्वाधिक डाळिंबाचे उत्पादनही महाराष्ट्रात होते. सर्वाधिक लागवड सोलापूर जिल्ह्यात आहे. त्यानंतर सांगली जिल्ह्याचा क्रमांक लागतो. राज्यात दर वर्षी नवीन लागवड करण्यासाठी शेतकरी पुढे येतात. सरासरी दर वर्षी अंदाजे दहा हजार हेक्टरवर नव्याने लागवड होत असते. मात्र गेल्या तीन ते चार वर्षांत डाळिंब उत्पादन घेणाऱ्या जिल्ह्यात अतिवृष्टी होऊ लागली आहे. त्यातच बदलत्या वातावरणामुळे डाळिंबावर तेलकट, मर, कुजवा आणि पीन होल बोअर रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे उत्पादन खर्चात २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. शिवाय उत्पादन खर्चही मिळणे कठीण बनत चालले आहे. त्यामुळे शेतकरी डाळिंब लागवडीसाठी पुढे येत नसल्याची स्थिती आहे.  डाळिंबावर सातत्याने येणारी नैसर्गिक संकटे आणि रोगाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षीपासून शेतकऱ्यांनी नवीन लागवडीकडे पाठ फिरवली असल्याचे डाळिंब संघाने सांगितले आहे. गेल्या वर्षभरात सोलापूर, अहमदनगर, उस्मानाबाद, सांगली, आणि पुणे जिल्ह्यातील काही भागातच नव्या डाळिंबाची काही प्रमाणात लागवड झाली आहे. वास्तविक पाहता, गेल्या वर्षीपासून राज्यात लागवडीचा वेग मंदावला असून, गतवर्षी राज्यात अवघी पाच टक्केच म्हणजे फक्त दोन हजार हेक्टरवर डाळिंबाची लागवड झाली आहे. 

गुजरात, राजस्थानात  लागवड वाढण्याची शक्यता  गुजरात, राजस्थानमध्ये दर वर्षी सरासरी तीन हजार हेक्टरने नवीन डाळिंबाची लागवड होत असते. या दोन राज्यात गेल्या दोन ते वर्षांपासून डाळिंबाला पोषक असे वातावरण आहे. त्यामुळे या दोन्ही राज्यातील डाळिंब उत्पादक शेतकरी नवीन लागवडीसाठी पुढे येत आहेत. यंदा गुजरात, राजस्थान या राज्यात सहा हजार हेक्टरने वाढ होईल, असा अंदाज आहे. 

प्रतिक्रिया  सलग तीन ते चार वर्षे अतिवृष्टीचा फटका डाळिंबाला बसला आहे. रोगाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे खर्च ही वाढला आहे. त्यामुळे डाळिंब लागवड करण्यासाठी शेतकरी पुढे येत नाहीत. त्याचा परिणाम नवीन डाळिंब लागवडीवर झाला आहे.  -प्रभाकर चांदणे, अध्यक्ष, अखिल भारतीय डाळिंब संघ

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com