नाशिक : ‘‘राज्य शासनाच्या पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेतंर्गत (आंबिया बहार) २०२०-२१ मध्ये डाळिंब व आंबा पिकांसाठी शेतकऱ्यांना सहभागी होता येईल. त्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर असून फळपिकांच्या नोंदणीसाठी राष्ट्रीय पीक विमा पोर्टल सुरु केले आहे,’’ अशी माहिती उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे यांनी कळविली.
डाळिंब व आंबा पिकासाठी अवेळी पाऊस, दैनंदिन अधिक तापमान, जास्त पाऊस व आद्रता, गारपीट या समाविष्ट धोक्यांसाठी विमा संरक्षण निश्चित केले आहे.
शेतकऱ्यांनी डाळिंब व आंबा फळपिकाच्या हवामान धोक्याची माहिती घेऊन नजीकच्या ई-सेवा केंद्र, बॅंक, वित्तीय संस्थांशी संपर्क साधून लाभ घ्यावा, असे आवाहन देवरे यांनी केले. अधिक माहितीसाठी कृषी विभागाच्या कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले.
कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचित क्षेत्रातील पिकासाठी लाभ घेणे ऐच्छिक आहे. केवळ उत्पादनक्षम फळबागांना विमा संरक्षण कवच लागू राहील. जमीन भुधारणेच्या मर्यादेत एका शेतकऱ्यास अधिसूचित फळपिकांसाठी ४ हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत विमा नोंदणी करण्याची मुभा आहे. अधिसूचित क्षेत्रात कुळाणे, भाडे पट्टीत शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसह सर्व डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना या योजनेत भाग घेता येईल.
आंबिया बहारातील डाळिंब व आंबा फळपिकाच्या हवामान धोक्याच्या सविस्तर माहितीसाठी कृषी विभागाचे संकेतस्थळ www.krishi.maharashra.gov.in भेट द्यावी. हवामान आधारित फळपीक विमा योजनेसाठी जिल्हानिहाय विविध विमा कंपन्या आहेत. जिल्ह्यासाठी एच. डी. एफ. सी अर्गो जनरल इन्शुरन्स कंपनीची निवड करण्यात आली आहे, असेही त्यांनी नमूद केले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.