डाळिंब बागांना दिले जातेय टॅंकरव्दारे पाणी
डाळिंब बागांना दिले जातेय टॅंकरव्दारे पाणी

डाळिंब उत्पादनात घट होण्याची शक्यता

२०१३ मध्येदेखील दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. यंदा पाऊस नसल्याने डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पाऊस झाला नाही तर मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होईल. - अंकुश पडवळे, प्रगतशील शेतकरी, सोलापूर.

सांगली ः राज्यात पावसाने दडी मारली आहे. यामुळे भूजल पातळी खालावली आहे. शेततळ्यांतील पाणीसाठा संपला आहे. यामुळे डाळिंब पिकासाठी पाणी कुठून आणायचे? असा प्रश्‍न डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना पडला आहे. परिमाणी मृग हंगामातील डाळिंबाच्या उत्पादनात सुमारे ३० टक्‍क्‍यांनी घट होण्याची शक्‍यता आहे.

राज्यातील कमी पाणी असलेल्या ठिकाणी डाळिंबाचा मृग बहार धरला जातो. सुरवातीच्या काळात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी डाळिंबाचा बहार धरला. पण त्यानंतर पावसाची रिमझिम आणि बदलत्या हवामानामुळे फुलगळ मोठ्या प्रमाणात झाली. त्याचा फटका डाळिंब उत्पादनाला बसला आहे. तरीदेखील शेतकऱ्यांनी योग्य नियोजन आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेत डाळिंब बागा फुलवल्या आहेत. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे बागेला पाणी देणे मुश्‍कील झाले आहे.

पाणीटंचाई निर्माण होऊ नये म्हणून डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी शेततळी घेतली आहेत. त्यातील पाण्याचा गरजेनुसार वापर केला जातो. त्याच प्रमाणे योजनांच्या माध्यमातून टॅंकरद्वारे पाणी आणून विहिरींमध्ये पाणीसाठा करण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो. मात्र, पाऊसच नाही, त्यामुळे भूजल पातळीत घट झाली आहे. हिरी आटल्या आहेत, कूपनलिकेत पाणी नसल्याने मोटारी बंद झाल्या. याचा परिमाण डाळिंब पिकावर होऊ लागला आहे.

सध्या डाळिंब फुलावस्थेतून फळ अवस्थेत आले आहेत. काही ठिकाणी लिंबूच्या आकाराची फळे झाली आहेत. आता पाण्याची गरज असताना ते मिळत नसल्याने फळांची वाढ थांबणार आहे. डाळिंब उत्पादक शेतकरी आता परतीच्या पावसाची प्रतीक्षा करू लागले आहेत. परतीचा पाऊस झालाच नाही तर डाळिंब उत्पादनात ३० टक्के घट होण्याची शक्‍यता आहे. २०१३ मध्ये दुष्काळी परिस्थिती आली होती. तशीच परिस्थिती आता पुन्हा उदभवली तर डाळिंब उत्पादक आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता आहे.

डाळिंब पिकाला पाण्याची नितांत आवश्‍यकता आहे. पाणी मिळाले नाही तर फळाची वाढ होणार नाही. परिणामी उत्पादन घटेल. गुजरात आणि राजस्थान या राज्यातदेखील मृग बहार धरला जातो. यामुळे दराची शाश्‍वती आत्ताच सांगता येणार नाही. अपेक्षित दर मिळाले नाही तर झालेले नुकसान भरून निघणार नाही, असे राणी उंचेगाव (जि. जालना) येथील डाळिंब उत्पादक शेतकरी भारत मंत्री यांनी सांगितले.

आमच्या भागात पाणीच नाही. योजनादेखील सुरू नसल्याने पाणी मिळत नाही. टॅंकरने पाणी आणायचे झाल्यास जवळपास कुठेच पाणी उपलब्ध नाही. शेततळ्यातील पाणीसाठा संपत आला आहे. पाणी नसल्याने दर्जेदार डाळिंबाचे उत्पादन घेणे कठीण बनले आहे, असे आटपाडी (जि. सांगली) येथील डाळिंब उत्पादक शेतकरी  संजय विभूते यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com