संत्रा उत्पादन वाढीचा अंदाज

या वर्षी आंबिया बहारात फळांचे उत्पादन साडेचार ते पाच लाख टनांपर्यंत राहण्याचा अंदाज आहे. मृग बहार सध्या फूलधारणेवर आहे. पावसाच्या पाण्यावर याचे व्यवस्थापन होते. मॉन्सूनपूर्व पावसामुळे या बहाराला काहीसा फटका बसला. त्यामुळे उत्पादकता प्रभावित होईल, अशी परिस्थिती सध्या आहे. - श्रीधर ठाकरे, कार्यकारी संचालक, महाऑरेंज
nagpur-orange
nagpur-orange

अमरावती ः पोषक वातावरणाच्या परिणामी या वर्षी आंबिया बहाराची उत्पादकता चांगली होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. अमरावती, नागपूर जिल्ह्यात एक लाख हेक्टर क्षेत्र असलेल्या संत्र्यापासून सुमारे साडेचार ते पाच लाख टनांचे उत्पादन अपेक्षित असल्याची माहिती महाऑरेंजच्या सूत्रांकडून देण्यात आली.  आंबिया बहाराचे व्यवस्थापन संरक्षित सिंचनाचे पर्याय असलेल्या शेतकऱ्यांद्वारे होते. सध्या आंबिया बहाराची फळे लिंबाच्या फळाच्या आकाराची आहेत. २० ऑगस्टपासून याची तोडणी सुरू होते. १ सप्टेंबरपासून याची फळे मिळतात. या हंगामातील फळाची चव थोडी आंबट राहते. 

या फळांना दक्षिणेत मागणी राहते. केरळ, चेन्नई, आंध प्रदेशमध्ये याचा पुरवठा होतो. त्यासोबतच बांगलादेशातही याचा पुरवठा केला जातो. या वर्षी वातावरण पोषक असल्याने साडेचार ते पाच लाख टन फळांच्या उत्पादनाचा अंदाज आहे. महाराष्ट्राची हेक्टरी सात ते दहा टन सरासरी उत्पादकता आहे.  मृग बहार फूलधारणेवर आहे. हे पीक जून महिन्यापर्यंत ताणावर सोडले जाते. सरासरी १५ मे पासून ताणावर सोडले जाते. जमिनीचा मगदूर पाहून ताणावर सोडण्याचा कालावधी ठरविला जातो. हलकी, मध्यम व भारी जमीन असे वर्गीकरण होते. मॉन्सूनपूर्व पावसामुळे ही प्रक्रिया डिस्टर्ब झाल्याने यावर्षी मृग बहारातील फळांची उत्पादकता प्रभावित होण्याची शक्यता आहे. मृग बहारातील फळे १५ जानेवारीपासून तोडणीसाठी येतात आणि १० एपिलपर्यंत याची फळे मिळतात. या बहारातील फळांची चव गोड राहते. परिणामी याला चांगला दर मिळतो, असे सांगण्यात आले.  कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर व्हिटॅमीन सीचा प्रभावी स्रोत असल्याने संत्र्याला मागणी वाढती आहे. परिणामी येत्या हंगामात दरात सुधारणा होण्याची शक्यता असल्याचेही महाऑरेंजकडून सांगण्यात आले. 

संत्रा उत्पादकांची शिवार फेरी आंबिया बहारात फळगळ खूप होते. त्याचे व्यवस्थापन अनुभवी शेतकऱ्याने कशा प्रकारे केले, हे इतरांना कळावे याकरिता महाऑरेंजने संत्रा उत्पादकांची शिवार फेरी संकल्पना मांडली आहे. त्याची सुरुवात काटोल येथील मनोज जवंजाळ यांच्या बांधावरून झाली. विनायक धोंगडी (अंबिकापूर), सुभाष दारोकर (आष्टी) यांच्या शेतावरही शिवारफेरी होणार आहे. महाऑरेंज आणि कृषी विभागाने या आयोजनासाठी पुढाकार घेतला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com