औरंगाबादस्थित खडकेश्वरा हॅचरिजचे संचालक संजय नळगीकर म्हणाले, की १५ मे पासून अधिक मासारंभ आहे. श्रावण महिन्याप्रमाणेच अधिक मासात उपवास पाळले जातात. मांसाहारी पदार्थांचा खप आपसूकच कमी होतो. ही बाब लक्षात घेऊन पोल्ट्री उद्योगाने संतुलित पुरवठ्याचे नियोजन केले आहे. तथापि, अल्पअवधीसाठी बाजारात पुरवठा अधिक आहे. येत्या पंधरा दिवसांत जसजसा पुरवठा संतुलित होत जाईल, तशी बाजारात सुधारणा दिसेल.
सध्याच्या पातळीवरून १५ ते १८ टक्क्यांपर्यंत सुधारणा अपेक्षित आहेत. दरवर्षी मेचा पहिला आठवडा बाजारभावाच्या दृष्टीने किफायती असतो. मागील दोन- तीन वर्षांत मे महिन्यात बाजारात सर्वाधिक उंच पातळीची नोंद झाली आहे, असे निरीक्षणही त्यांनी नोंदवले.
कोमरला समूहाचे संचालक कृष्णचरण यांनी सांगितले, की गेल्या तीन महिन्यांपासून बाजारभाव मंदीत राहत आहेत. ही बाब लक्षात घेता येत्या काळात वैयक्तिक पातळीवर उत्पादन नियंत्रित ठेवण्याची गरज आहे. यामागील कारणे अशी आहेत. १) मागील दोन - तीन वर्षांमध्ये उन्हाळ्यामध्ये बाजारभाव किफायती राहतोय. मात्र, या वर्षी खूप नकारात्मक प्रचार आणि घटनांनी बाजार विस्कळित करून टाकलाय. सोशल मीडियावर चिकन संदर्भात तथ्यहीन गोष्टींचा प्रसार झाला, ज्यामुळे मागणीत काही अंशी घट दिसली आहे. २) मार्च महिना फारसा उष्ण नव्हता, गेल्या काही वर्षांच्या तुलनेत मार्चमधील वातावरण थंड राहिले. परिणामी, वजनरूपी पुरवठा वाढून बाजारभावातील मंदी आणखी सखोल झाली.
३) एकूणच ब्रॉयलर पोल्ट्री उद्योगातील प्लेसमेंट ही सुमारे २५ टक्क्यांपर्यंत वाढली आहे. आधीच मागणी कमी असताना अशा प्रकारची उत्पादनवाढ ही मंदीत भर घालणारी ठरली आहे. ४) वातावरणातील चढ-उतारांमुळे उत्पादकता घटून पॅनिक सेलिंग वाढली आहे, ज्यामुळे बाजार आणखी खोलात गेला. ५) येत्या काळात एका दिवसाच्या पिलांची उपलब्धता वाढणार आहे. यामुळे एकूण पुरवठ्यात वाढच होईल. वरील सर्व परिस्थिती पाहता आर्थिक वर्ष १७-१८ मध्ये सरासरी मार्जिनमध्ये जी सुधारणा दिसली, तशी परिस्थिती आता १८-१९ मध्ये दिसत नाही आणि हे वास्तव स्वीकारण्याशिवाय अन्य पर्याय नाही. यातून मार्ग काढणे अवघड आहे. पण काही व्यवहार्य उपाययोजना शक्य आहेत का, याची पडताळणी केली पाहिजे.
आपण स्वंयस्फूर्तीने हॅचिंग एग्ज आणि पिलांची परराज्यांतून होणारी आयात थांबवू शकतो. यामुळे २० टक्क्यांपर्यंत प्लेसमेंट कमी होऊ शकते. अशाप्रकारे जर वैयक्तिक पातळीवर उत्पादन नियंत्रित झाले, तर मोठे आर्थिक नुकसान हे छोट्या नुकसानात रुपांतरित होईल, अशी भूमिका कृष्णचरण यांनी मांडली आहे.