वाढती उष्णता, पाणीटंचाईमुळे पोल्ट्री व्यावसायिक अडचणीत

उष्णता वाढल्याने पक्षी मरतूक वाढली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत फीड व तुसाच्या किंमतीतही वाढ झाली आहे. उष्णता जास्त असल्याने पक्ष्यांच्या वजनात घट येत आहे. -चिंधा गोविंदा पवार , कुक्कुटपालक, वराडी, ता. चांदवड, जि. नाशिक.
पोल्ट्री व्यावसायिकांना पाणीटंचाईमुळे टँकरचे पाणी विकत घ्यावे लागत आहे
पोल्ट्री व्यावसायिकांना पाणीटंचाईमुळे टँकरचे पाणी विकत घ्यावे लागत आहे

नाशिक : सध्या तापमानात झालेली वाढ व पाणीटंचाई या प्रमुख कारणांमुळे पोल्ट्री व्यावसायिक  अडचणीत सापडला आहे. पक्ष्यांना उष्णता असहाय होत असल्याने मरतुकीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. यामुळे पोल्ट्री व्यावसायिकांना मोठा फटका  बसण्याची शक्यता आहे.  

शेतीला पूरक व्यवसाय म्हणून अनेक शेतकरी पोल्ट्रीला प्राधान्य देतात. कॉन्ट्रॅक्ट पोल्ट्री फार्मिंगच्या माध्यमातून हा व्यवसाय उत्तर महाराष्ट्रात विस्तारला आहे. खाद्य, औषधे, पक्षी यांचा पुरवठा संबंधित कंपन्यांकडून होतो. मात्र सध्य स्थितीत  हवामान बदलामुळे  कंपन्या व कुक्कुटपालक अडचणीत सापडल्याची चित्र आहे. पक्ष्यांच्या संगोपनावर त्यांचे आर्थिक गणिते असतात. त्यामुळे ही सर्व गणिते यंदा बिघडली आहेत.  

मागील वर्षाच्या तुलनेत मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच उष्णतेची लाट आली आहे. ऐरवी ही स्थिती एप्रिल महिन्याच्या मध्यावधीत जाणवते. उन्हाच्या तीव्रतेमुळे पक्षी दुपारच्या वेळी खाद्य खात नाही, त्यामुळे वजनात घट होते. रोगप्रतिकारक शक्तीचा अभाव असल्याने पक्षी रोगांना बळी पडत आहे. पारंपरिक पद्धतीचे शेड असल्याने उष्णता संतुलित करण्यात अडचण येत आहे. कमी पावसामुळे काही भागात पाणीटंचाई ही प्रमुख अडचण बनली आहे. पक्ष्यांना पिण्यासाठी व थंडावा निर्माण करण्यासाठी आवश्यक पाणी सध्या उपलब्ध होत नाही. त्यामुळे टँकरद्वारे विकत पाणी घेऊन व्यवस्था करावी लागत आहे. त्याची किंमत यावर्षी दुप्पट झाली आहे. उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी कांदा बारदान लावून त्यावर पाण्याचे फवारे मारून उष्णता कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय. तसेच छतावर पत्र्याला कुलपेंट मारून त्यावर चारा टाकण्यात आला आहे. 

सध्या चालू असलेल्या बॅचमधील पक्षी मृत होत असल्याने उत्पादन खर्च वाया जात आहे. चालूवर्षी वर्षी मका पिकाचे उत्पादन कमी झाले आहे. मागणीप्रमाणे मका सध्या उपलब्ध होत नाही. त्यामुळे खाद्यानिर्मितीमध्ये मका उपलब्ध होण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे सध्या मागील वर्षाच्या तुलनेत खाद्याचे वाढले आहे. या बरोबरीने औषधांचे दरही वाढलेले आहेत. तीव्र उष्णतेमुळे पक्ष्यांची वाढ, वजन व गुणवत्ता यावरही विपरीत परिणाम होत आहे. मजूर टंचाईमुळे व्यवसाय करताना पोल्ट्री व्यावसायिकांना कसरत करावी लागत आहे.

तापमान अधिक असल्याने   पक्ष्यांना अनुकूल थंडावा निर्माण केला आहे. कुठल्याही प्रकारचा संसर्ग होऊ नये, यासाठी शुद्ध पाणीपुरवठा करण्यावर भर आहे. पक्षी कुठल्याही आजाराला बळी पडणार नाही. याकरिता योग्य तो औषधोपचार वेळेवर करण्यावर भर दिला आहे, अशी माहिती अंबासन (ता. बागलाण, जि.नाशिक) येथील कु्क्कुटपालक  उज्वल नांद्रे यांनी दिली.

उष्ण हवामान असल्याने पक्षी दुपारी खाद्य खात नाहीत. मागील वर्षाच्या तुलनेत उष्णता अधिक असल्याने खूप कष्ट घ्यावे लागत आहे. पाणी प्रश्न बिकट असल्याने पाणी विकत घेऊन पक्ष्यांना द्यावे लागत आहे, असे विराने (ता. मालेगाव, जि. नाशिक) येथील कुक्कुटपालक  विलास पगार यांनी सांगितले.

सध्याच्या प्रमुख अडचणी  

  • मागील वर्षाच्या तुलनेत अगोदर वाढलेली उष्णता
  • पाणीटंचाईमुळे काही भागात पाणी विकत घ्यावे लागत आहे. 
  • खाद्य व औषधांचे वाढलेले दर 
  • पक्ष्यांची मरतूक अधिक
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com