नाशिक : गिरणा धरणामध्ये मासेमारीचा ठेका दिल्यामुळे मालेगाव व नांदगाव तालुक्यातील स्थानिक मच्छिमार बेरोजगार झाले आहेत. ठेकेदाराकडून पाण्यात रासायनिक द्रव्य टाकण्यात आले. त्यामुळे जलचर मोठ्या प्रमाणात नष्ट होत आहेत. तसेच ५६ खेड्यांतील पाणी पुरवठा व मालेगाव शहरातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे खासगी मच्छिमाराचा ठेका रद्द करावा, या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्ष व स्थानिक मच्छिमारांनी सोमवारी (ता. १३) गिरणा धरण पात्रात जलसमाधी आंदोलन केले.
आंदोलक जलसमाधी आंदोलन करत असल्याची माहिती मिळताच तहसीलदार चंद्रजीत राजपूत व तालुका पोलिसांनी आंदोलनस्थळी धाव घेतली. या मागणीसाठी संबंधित विभागाकडे पाठपुरावा सुरू आहे. मंगळवारी (ता. १४) तहसील कार्यालयात स्थानिक मच्छिमार व पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन चर्चा करु, असे आश्वासन दिल्यानंतर जलसमाधी आंदोलन सायंकाळी मागे घेण्यात आले.
आंदोलनकर्ते पाण्यात ठाण मांडून होते. ठेकेदाराने आणलेल्या परप्रांतीय कामगारांकडे कोणतेही वैध कागदपत्रे नाहीत. ते गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत. ठेकेदार परप्रांतीय असल्याने स्थानिक मच्छिमारांना मारहाण, खोटे गुन्हे दाखल करणे, दहशतीचा अवलंब करतो. ठेका रद्द न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.
प्रहार जनशक्तीचे मालेगाव तालुका अध्यक्ष शेखर पगार, विकास खेडकर, शुभम भदाणे आदींनी आंदोलनाचे नेतृत्व केले. जलसमाधी आंदोलनात संजय शिवदे, बापू कोळी, सतिश भोई, अर्जुन जावळे, सोनू मोरे, दीपक भोई, विष्णू सोनवणे, संजय भोई, शिवाजी नाईक, संदीप भोई आदींसह शंभरहून अधिक मच्छिमार पुरुष व महिला लेकराबाळांसह सहभागी झाल्या.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.