पुणे ः देशाची विजेची मागणी पूर्ण झाली असून, उच्च मागणीच्या काळातदेखील २.५ टक्के वीज शिल्लक होती. यामुळे आता पाण्यावरील वीजनिर्मिती बंद करून, ते पाणी बोगद्यांद्वारे देऊन मराठवाडा कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्याची आमची योजना आहे. या योजनेमुळे भविष्यात पाण्यासाठी एकही नागरिक वंचित राहणार नसल्याचा आम्हाला विश्वास आहे. हाच आमचा निवडणुकीचा मुद्दा असणार असून, नागरिकांनी याचा विचार करून आम्हाला सत्ता द्यावी, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.
पुण्यात सोमवारी (ता.२३) आयोजित पत्रकार परिषदेत ॲड. आंबेडकर बोलत होते. ते म्हणाले, की राज्यात कोयना आणि टाटाच्या पुणे जिल्ह्यातील पाच धरणांमधील पाण्यावर वीजनिर्मिती केली जाते. मात्र आता विविध पद्धतींमुळे आणि अपारंपरिक ऊर्जेमुळे भारत स्वयंपूर्ण झाला आहे. सरकारच्या अहवालानुसार उच्च मागणीच्या काळात मुबलक वीजपुरवठा करूनदेखील २.५ टक्के वीज शिल्लक राहिली होती. यामुळे आता पाण्यावर उत्पादित होणारी वीजनिर्मिती बंद करून हे पाणी मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागासाठी बोगद्याद्वारे देण्याची आमची योजना आहे. यासाठी कोयना आणि टाटाच्या धरणांमधून वीजनिर्मिती झाल्यानंतर ८० टीएमसी पाणी नद्यांद्वारे समुद्राला मिळते. हे पाणी वाया जाते. हे वाया जाणारे पाणी बोगद्यांद्वारे कृष्णा नदीच्या पात्रातून गोदावरी आणि उत्तर महाराष्ट्रातील नद्यांमध्ये आणले जाईल. हे शाश्वत पाणी कोरडवाहू भागाला मिळाल्यास भविष्यात एकही नागरिक पाण्यापासून वंचित राहणार नाही. ही योजनाच आमच्या निवडणुकीचा मुद्दा असणार आहे. ही योजना साकारायचे धाडस यापूर्वीच्या सरकारमध्ये नव्हते ते धाडस आम्ही दाखवित आहोत.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.