खानदेशात पाऊस, वाऱ्यामुळे पूर्वहंगामी कपाशीचे नुकसान

पूर्वहंगामी कपाशीची स्थिती बऱ्यापैकी होती. परंतु मागील तीन-चार दिवसांपासून सुरू असलेला पाऊस व ढगाळ वातावरण यामुळे बोंडे काळवंडत असून, नुकसान होत आहे. - भारत विश्‍वनाथ पाटील, कापूस उत्पादक, डोमगाव, जि. जळगाव. आमच्या भागात कपाशीचे पीक अधिक असते. कोरडवाहू कपाशीला पावसाचा लाभ आहे. परंतु, बागायती कपाशीमध्ये कैऱ्या सडणे, कैऱ्या लाल पडणे असे प्रकार सुरू झाले आहेत. तसेच कापूस वेचणीही थांबली आहे. - प्रकाश नामदेव सपके, कापूस उत्पादक, पिचर्डे, ता. भडगाव, जि. जळगाव.
पुर्व हंगामी कपाशीचे नुकसान
पुर्व हंगामी कपाशीचे नुकसान

जळगाव  ः जिल्ह्यासह नंदुरबार व धुळे जिल्ह्यांतील सातपुडालगतच्या भागातील पूर्वहंगामी किंवा बागायती कपाशी पीक आता पाऊस व सोसाट्याच्या वाऱ्याने लोळविले आहे. कैऱ्या सडणे, बोंडे काळवंडणे अशा समस्या कपाशीच्या पिकात निर्माण झाल्या आहेत.

जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून कमी-अधिक पाऊस सुरू आहे. तत्पूर्वी मागील आठवड्यात भुसावळ, मुक्ताईनगर, रावेर, यावल, बोदवड, जामनेर भागाला पावसाने झोडपले होते. या पावसाचा लाभ मका, ज्वारी व कोरडवाहू कपाशीला होत असला, तरी पूर्वहंगामी कपाशीचे मात्र नुकसान होत असल्याच्या शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आहेत.

जळगाव जिल्ह्यात जवळपास ८० हजार हेक्‍टर तर धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत मिळून ३० हजार हेक्‍टरवर पूर्वहंगामी कपाशी पीक आहे. मे व जून महिन्यांत सूक्ष्मसिंचन यंत्रणेवर अनेक शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली. यात अनेक शेतकऱ्यांनी लवकर वेचणीवर येणाऱ्या बीटी कापूस वाणांची लागवड केली आहे.

भाद्रपद महिन्यातील उन्हात बोंडे उमलली मध्यंतरी भाद्रपद महिन्यातील ऊन चांगलेच तापवत होते. अनेक ठिकाणी तर कोरडवाहू कपाशीने माना टाकल्या, एवढी उष्णता होती. अशा उन्हात पूर्वहंगामी कपाशीमधील बोंडे उमलली. कापूस वेचणीचे कामही काही ठिकाणी सुरू झाले. अनेक शेतकऱ्यांच्या घरात कापूस साठवलाही आहे. तो त्यांनी त्यातील आर्द्रता घालविण्यासाठी वाळविण्याचे कामही सुरू केले होते.

जळगाव जिल्ह्यात चोपडा, यावल, जळगाव, अमळनेर, पाचोरा, जामनेर भागांत पूर्वहंगामी कापूस वेचणी सुरू झाली होती. तर नंदुरबारसह तळोदा, शहादा भागांतही कापूस वेचणी सुरू झाली होती. धुळे जिल्ह्यातील धुळे, शिरपूर तालुक्‍यांत कापूस वेचणीची कामे काही भागांत मागील आठवड्यात सुरू होती. अशातच पावसाचे आगमन झाले. उमलण्याच्या अवस्थेत असलेली बोंडे किंवा कैऱ्या पावसामुळे लाल व काळ्या पडून कडक बनत आहेत. तर उमललेली बोंडे ओली होऊन काळवंडत आहेत. पूर्वहंगामी कपाशीमध्ये आर्द्रता अधिक राहते. हवा खेळती राहत नाही, परिणामी बोंडे ओलीच राहतात. याचा फटका कापसाच्या गुणवत्तेला बसत असल्याचे चित्र आहे. आता पाऊस सुरू असल्याने कापूस वेचणीच्या कामाला फटका बसू लागला आहे.

दोन दिवसांपूर्वी तापीकाठ व गिरणा काठालगतच्या जळगाव, पाचोरा, चोपडा तालुक्‍यांतील गावांमध्ये सुसाट वाराही होता. या वाऱ्यानंतर पाऊस आला. या वाऱ्यामुळे पूर्वहंगामी कपाशी कैऱ्या, पाते, फुलांचे वजन अधिक असल्याने लोळल्या. त्या जमिनीशी आल्याने कैऱ्या व पात्यांची नासाडी होण्याची समस्या अधिक वाढली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com