जळगाव ः खानदेशात पूर्वमोसमी पावसाचा गेले तीन दिवस अनेक भागात धुमाकूळ सुरू आहे. यामुळे कांदा, मका, बाजरी या पिकांची हानी झाली आहे. शिवाय सततच्या ढगाळ वातावरणामुळे केळी पिकाची काढणीदेखील वेगात करून घ्यावी लागत आहे.
या आठवड्यात सोमवारपासून (ता.३) जळगाव, धुळे व नंदुरबारात पाऊस झाला आहे. यात धुळ्यातील साक्री, शिरपूर, शिंदखेडा, नंदुरबारमधील तळोदा, शहादा, नवापूर, जळगावमधील रावेर, जामनेर आदी भागात पाऊस व वादळी वाऱ्यांमुळे पिकांचे नुकसान झाले. सततच्या ढगाळ वातावरणासह सुसाट वाऱ्यामुळे केळी पिकात काढणीवर आलेल्या केळी झाडांची पडझड वाढली आहे. यामुळे नुकसान होत आहे.
सध्या रावेर, यावल, मुक्ताईनगर, नंदुरबारमधील तळोदा, शहादा भागात केळी पिकाची काढणी सुरू आहे. पण वातावरण ढगाळ, सुसाट वाऱ्यांचे असल्याने शेतकरी केळीची काढणी मिळतील, त्या दरात करून घेत आहेत. त्यात लॉकडाऊनचाही फटका बसत आहे. पावसामुळे रावेर, मुक्ताईनगर, साक्री, शिरपूर भागात बाजरी, कांदा पिकांची हानी झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे वित्तीय नुकसान झाले असून, पंचनामे व तातडीने भरपाईची मागणी केली जात आहे.
मक्याची काढणी सुरु
सध्या मका काढणी सुरू आहे. काही भागात मका पिकाची पक्व कणसे गोळा केली आहेत. या कणसांना पावसाच्या भीतीने झाकून ठेवावे लागत आहे. कारण, पावसात कणसे भिजल्यास मळणीत अडचणी येतील. पावसाच्या भीतीने कापूस, पपई, गहू आदी पिकांखाली रिकाम्या झालेल्या क्षेत्रात मशागतीचे काम शेतकरी करून घेत आहेत. ट्रॅक्टरने नांगरणी सध्या सुरू आहे. शेतात गोळा केलेल्या कडब्याची कुट्टी करून ती घरात किंवा गोठ्यात साठवून घेतली जात आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.