पूर्वमोसमी पावसाचा रब्बी पिकांना दणका

हवामान बदलामुळे कधी तीव्र उन्ह तर कधी ढगाळ हवामान अशी स्थिती निर्माण झालेली आहे. तर मागील दोन दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्याला वादळी पावसाचा फटका बसला आहे.
Pre-monsoon rains hit rabi crops
Pre-monsoon rains hit rabi crops

पुणे ः हवामान बदलामुळे कधी तीव्र उन्ह तर कधी ढगाळ हवामान अशी स्थिती निर्माण झालेली आहे. तर मागील दोन दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्याला वादळी पावसाचा फटका बसला आहे. तर कोल्हापूर जिल्ह्याला पूर्वमोसमी पावसाने झोडपले असून सिंधुदुर्ग, सांगली जिल्ह्यात ही काही ठिकाणी पावसाने हजेरी लावल्याने पिकांना फटका बसला आहे. सद्यःस्थितीत गहू, शाळू पिकांची काढणी सुरू आहे. तर आंबा आणि काजूचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

रत्नागिरीत वादळाने घरांची पडझड  पूर्वमोसमी पाऊस, वादळामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. वादळाचा रत्नागिरी जिल्ह्यात मोठा फटका आहे. राजापूर तालुक्यात रायपाटण, पाचलमध्ये जोरदार पडझड झाली आहे. अनेकांच्या घरांवर झाडे उन्मळून पडली, कौले उडाली, पत्रे उडाले. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. बुधवारी (ता. २३) झालेल्या वादळानंतर रात्रीपासून वीज गायब झाली होती. रायपाटण येथील ३५ घरांचे ५० हजाराचे तर तळवडे येथील ७ घरांचे सुमारे ३० हजार रुपये नुकसान झाले आहे. 

आंबा, काजूचे नुकसान राजापूर तालुक्यात वादळी पावसाचा जोरदार तडाखा आंबा-काजू पिकांना बसला. अनेक ठिकाणी आंबा-काजूच्या बागांना तडाखा बसला. कलमे वाकली, काही मोडून पडली, बागांचे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यात मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. ऐन हंगामात आंब्याची गळ झाल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात रोपवाटिकांना फटका वादळी वाऱ्यासह पावसाने कागल, राधानगरी, जयसिंगपूर तालुक्याला दणका दिला आहे. यामध्ये अनेक ठिकाणी शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. तर हमिदवाडा येथे मधुकर पाटील (रा. कौलगे) यांचे ग्रीन हाऊस कोसळून रोपवाटिकेतील रोपासह सुमारे सात लाख रुपयांचे नुकसान झाले. तर अर्जुनवाडा येथील नारायण चोपडे यांच्या घरावरील पत्रे उडून चाळीस हजारांचे नुकसान झाले. येळवडे परिसरात पंधरा मिनिटे पावसाच्या सरी झाल्या. यासह हातकणंगले तालुक्यातही सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस झाला. 

पावसाने द्राक्ष, बेदाण्याला धोका सांगली जिल्ह्यात जिल्ह्यातील बहुतांश भागात गुरुवारी (ता. २४) वादळी वाऱ्यासह पूर्वमोसमी पावसाने झोडपले. यामुळे द्राक्ष, बेदाणा पिकाला धोका निर्माण झाला आहे. तसेच ऐन गहू, शाळू काढणीच्या दिवसात पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे अगोदरच शेतकरी चिंताग्रस्त होता. सांगली जिल्ह्यातील कडेगाव, वाळवा, कवठेमहांकाळ, खानापूर या तालुक्यात कमी अधिक पाऊस झाला. वादळी वाऱ्याने चिंचणी, लोढे, कौलगे, सावर्डे, आरवडे, खुजगाव, वाघापूर, वस्तवडेसह अनेक गावांत रस्त्यावर मोठी झाडे उन्मळून पडली. त्यामुळे काही काळ  वाहतूक बंद होती 

आंबा, काजू पिकाचे नुकसान अटळ सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या काही भागात गुरुवारी (ता. २४) मध्यरात्रीनंतर पाऊस झाल्यामुळे आंबा आणि काजू पिकाचे नुकसान झाले आहे. वैभववाडी, कणकवली तालुक्यातील काही भागात पावसाचे प्रमाण अधिक होते. २३ मार्चला जिल्ह्याच्या बहुतांशी भागात वादळीवाऱ्यांसह अवकाळी पाऊस झाला. यामध्ये मोठे नुकसान झाले. गुरुवारी ही दिवसभर जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. वैभववाडी, कणकवली तालुक्यातील अनेक गावांमध्ये पावसाच्या सरी कोसळण्यास सुरुवात झाली. दरम्यान शुक्रवारी (ता. २५) सकाळपासूनदेखील पावसाचे वातावरण आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com