नाशिकमध्ये पूर्वमोसमी पावसाचा ४५९ हेक्टरवरील पिकांना फटका

नाशिक जिल्ह्याच्या विविध भागात एप्रिल महिन्याच्या अखेरीस ते मे महिन्याच्या पहिल्या सप्ताहात वादळी वाऱ्यासह झालेला पूर्वमोसमी पाऊस व गारपिटीमुळे शेती पिकांचे पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
नाशिकमध्ये पूर्वमोसमी पावसाचा ४५९ हेक्टरवरील पिकांना फटका Pre-monsoon rains in Nashik Crops on 459 hectares hit
नाशिकमध्ये पूर्वमोसमी पावसाचा ४५९ हेक्टरवरील पिकांना फटका Pre-monsoon rains in Nashik Crops on 459 hectares hit

नाशिक : जिल्ह्याच्या विविध भागात एप्रिल महिन्याच्या अखेरीस ते मे महिन्याच्या पहिल्या सप्ताहात वादळी वाऱ्यासह झालेला पूर्वमोसमी पाऊस व गारपिटीमुळे शेती पिकांचे पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अडीच हजार शेतकरी या नुकसानीच्या तडाख्यात प्रभावित झाले आहेत. हे नुकसान ४५९.३३ हेक्टर क्षेत्रावर झाल्याची माहिती कृषी विभागाच्या नुकसानीच्या प्राथमिक अहवालानुसार समोर आली आहे. मात्र, क्षेत्रीय पातळीवर नुकसान अधिक असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

कृषी विभागाने क्षेत्रीय पातळीवरून २९ एप्रिल ते २ मे दरम्यान झालेले नुकसान संबंधित प्राथमिक अहवाल जाहीर केला. त्यामध्ये सर्वाधिक नुकसान उन्हाळी कांदा पिकाचे झाले आहे. भाजीपाला पिकांनाही मोठ्या प्रमाणावर फटका बसल्याचे माहितीवरून समोर आले आहे. मागील वर्षांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनमुळे बाजार समित्यांचे कामकाज अस्थिर आहे. त्यात नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान वाढल्याने शेतकऱ्यांवर संकट वाढतेच आहे.

पूर्वमोसमीच्या तडाख्यात कांद्याचे सर्वाधिक नुकसान कळवण व सटाणा तालुक्यात झालेले आहे. इगतपुरी तालुक्यात भाजीपाल्याचे नुकसान आहे. येवला, नांदगाव, इगतपुरी, त्र्यंबक व नाशिक तालुक्यातील नुकसान कृषी विभागाने विचारात घेतले आहे. ज्यामध्ये कांदा, बाजरी, भाजीपाला, मका व आंबा पिकाचे नुकसान आहे. इगतपुरी तालुक्यात मक्याचे नुकसान २ हेक्टरवर आहे तर त्र्यंबक तालुक्यात ४० हेक्टरवर आंब्याचे नुकसान आहे. 

चालू वर्षी प्रतिकूल परिस्थितीत भांडवल नसताना शेतकऱ्यांनी पदरमोड करून पिके उभी केली होती. अनेक शेतकऱ्यांची कांदा व भाजीपाला पिके काढणीला असताना पावसाच्या तडाख्यात ही पिके मातीमोल झाली आहेत. अनेक ठिकाणच्या भाजीपाला लागवडी ज्यामध्ये प्रामुख्याने हिरवी मिरची, टोमॅटो, कोबी, कारली, शेवगा, वांगी या सारख्या पिकांचे नुकसान झाले आहेत.  

 अनेक तालुक्यांतील नुकसानीचा उल्लेखच नाही  कृषी विभागाने प्राथमिक नुकसानीची माहिती दिली. ही माहिती २९ एप्रिल ते २ मे दरम्यानची आहे. मात्र त्यानंतर जिल्ह्यात ९ मेपर्यंत वादळी वाऱ्यासह पूर्वमोसमी पाऊस झाला आहे. त्यामध्ये सिन्नर, पेठ, निफाड, चांदवड, दिंडोरी व देवळा तालुक्यांत नुकसान असताना या अहवालात त्याचा कुठेही उल्लेख नाही. त्यामुळे हे नुकसान प्रत्यक्षात अधिक आहे. मात्र, शेतकऱ्यांनी कृषी विभागाला संपर्क केला असता पंचनाम्याचे आदेश नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे पंचनामे करून नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

जिल्ह्यातील नुकसान असे

  • जिल्ह्यात बाधित शेतकरी    १२२४
  • एकूण नुकसानग्रस्त गावे    ५४
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com