महाजनादेश यात्रेत सावधगिरी म्हणून शेतकरी नेते मध्यरात्री घेतले ताब्यात

नाशिक येथे महाजनादेश यात्रेत सावधगिरी म्हणून शेतकरी नेते मध्यरात्री घेतले ताब्यात
नाशिक येथे महाजनादेश यात्रेत सावधगिरी म्हणून शेतकरी नेते मध्यरात्री घेतले ताब्यात

नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या महाजनादेश यात्रेची सांगता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज (ता. १९) होत आहे. या पार्श्‍वभूमीवर बुधवारी (ता. १८) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नाशिक शहरातून रॅली झाली. या यात्रेत कुठलाही अडथळा व गैरप्रकार होऊ नये यासाठी प्रशासनाने धसका घेतल्याचे दिसून आले. या वेळी अनेक विरोधी पक्ष, शेतकरी संघटना यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते ताब्यात घेण्यात आले होते.  सरकारने नुकताच कांदा आयात करण्याचे धोरण स्वीकारले. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात कांदा उत्पादकांमध्ये तीव्र संताप आहे. त्यामुळे कुठलाही गैरकारभार घडू नये याची सावधगिरी पोलिसांनी घेतली आहे. विविध पक्षांनी सरकारला आंदोलनाचा इशारा दिल्याने नाशिक पोलिसांनी मध्यरात्री अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन देवळाली कॅम्प पोलिस स्थानकात नजर कैदेत ठेवले होते. यामध्ये स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष हंसराज वडघुले, नाशिक तालुक्याचे अध्यक्ष रतन मटाले, प्रहार पक्षाचे जिल्हाप्रमुख अनिल भडांगे, ‘आप’चे योगेश कापसे, स्वप्निल घिया यांसह विविध कार्यकर्ते ताब्यात होते. तर शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अर्जुन बोराडे, पदाधिकारी शंकर पुरकर, भगवान बोराडे यांनाही निवासस्थानी जाऊन नजरकैदेत ठेवण्यात आले होते. यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कांद्याच्या मिळालेल्या पैशाची मनिऑर्डर करणारे संजय साठे यांच्यावरही लक्ष ठेवण्यात आले होते. तसेच पंतप्रधान मोदी यांना रक्ताचे पत्र लिहणारे कृष्णा डोंगरे यांना येवला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे संपूर्ण नाशिक जिल्ह्यात असंतोष पसरला आहे. 

रात्रीबेरात्री एखाद्या अतिरेक्यासारखे घरातून अटक करणे व शहरापासून दूर पोलिस स्टेशनला नेऊन ठेवणे. या सरकारची शेतकऱ्यांचे प्रश्‍न मिटवण्याऐवजी विरोधकांनाच मिटवणे असे कट कारस्थान सुरू आहे. अशीच मुस्कटदाबी सुरू राहिली तर शेतकऱ्यांच्या असंतोषाला सामोरे जावे लागेल. - प्रा. संदीप जगताप,  राज्य प्रवक्ता, स्वाभिमानी शेतकरी संघटना

आम्ही कार्यकर्ते आंदोलन करणार नाही असे सांगितले असतानाही पोलिसांनी कार्यकर्त्यांना झोपेत असताना ताब्यात घेतले. त्यामुळे राज्य शासन व पोलिस यंत्रणेचा निषेध करतो. घोटाळेबाजांना पाठीशी घालून सरकार शेतकऱ्यांच्या आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे.  - गोविंद पगार,  जिल्ह्याध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, नाशिक

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com