जळगाव : खानदेशात रब्बी पीककर्ज वितरणाची तयारी सुरू आहे. बँका ऑक्टोबरपासून हे कर्ज वितरण सुरू करतील. सुमारे ६०० कोटी रुपये पीककर्ज रब्बीसंबंधी दिले जाईल, अशी माहिती आहे.
खरिपातील पीककर्ज सुमारे ७५ टक्के वितरित झाले आहे. जळगाव जिल्ह्यात सुमारे २८०० कोटी रुपये पीककर्ज वितरण लक्ष्यांक होता. धुळे व नंदुरबारात मिळून सुमारे ११०० कोटी रुपये पीककर्ज खरिपात वितरित करायचे होते. हे पीककर्ज बऱ्यापैकी वितरित झाले आहे.
रब्बी हंगाम अधिकृतपणे ऑक्टोबरमध्ये सुरू होईल. या हंगामातही पीककर्जाचे प्रस्ताव शेतकरी तयार करीत आहेत. काही नवे प्रस्तावदेखील तयार होत आहेत. प्रशासनानेदेखील बँकांकडून मध्यंतरी रब्बी पीककर्ज वितरणाची माहिती मागितली होती. रब्बी पीककर्जासंबंधी जळगाव जिल्ह्यात सुमारे ४५० कोटी रुपयांची तरतूद करणे आवश्यक आहे.
धुळे व नंदुरबारात सुमारे १५० कोटी रुपये वितरित केले जातील. रब्बीमध्ये केळी, ऊस, पपई, ज्वारी आदी पिकांसाठी पीककर्ज वितरण केले जाईल. यंदा हे पीककर्ज अधिकचे आवश्यक आहे. कारण खरिपात पिकांची मोठी हानी झाली आहे. अनेक शेतकरी कर्ज बोजा नसलेल्या खात्यांवर किंवा शेत जमिनीवर पीककर्ज घेतील.
सर्च रिपोर्टचा खर्च कमी करा
पीककर्जासंबंधी अनेक शेतकरी सर्च रिपोर्ट तयार करीत आहेत. बँकांनी त्यासाठी काही वकिलांची नियुक्ती केली आहे. त्यासाठी १ ते दीड हजार रुपये खर्च येत आहे. हा खर्च कमी करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. तसेच सर्च रिपोर्टसाठी फक्त मागील पाच वर्षांतील नोंदी, फेरफार यांची सक्ती करावी, अशी मागणीदेखील केली जात आहे. काही बँका मागील २० ते २५ वर्षांतील नोंदी, फेरफार यांची मागणी करतात. परंतु ही बाब योग्य नाही, असा मुद्दाही शेतकरी उपस्थित करीत आहेत.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.