कृषी कर्मचाऱ्यांवर दबाव कुणासाठी?

crop insurance
crop insurance

पुणे : राज्याच्या कृषी विभागाकडून गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेले विमा कंपन्यांचे लांगूनचालन आता कर्मचाऱ्यांनाही त्रासदायक ठरले आहे. ‘विमा कंपन्यांची कामे दबाव आणून करून घेतली जात आहेत,’ अशी तक्रार कर्मचाऱ्यांनी केली आहे. ‘पीकविम्याबाबत शेतकऱ्यांमध्ये रोष असून, यातील अडचणी आयुक्तांनी सोडव्यात, अन्यथा भविष्यात उद्भवणारे परिणाम पाहून आम्ही कोणतेही काम करणार नाही,’ असा इशारा राज्यातील क्षेत्रिय कर्मचारी वर्गाने दिला आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी असलेल्या पीकविमा योजनेत अनेक घोळ घालून कंपन्यांची हुजरेगिरी करणाऱ्या काही अधिकाऱ्यांची चर्चा गेल्या काही दिवसांपासून कर्मचाऱ्यांमध्ये सुरू आहेच; मात्र, वरिष्ठ पातळीवरून या गोंधळाला अभय मिळते. त्यामुळे विमा कंपन्यांसाठी सुरू असलेली हुजरेगिरी थांबलेली नाही. त्याचा फटका आता कृषी विभागाच्याच कर्मचाऱ्यांना बसतो आहे. महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटनेने कृषी आयुक्त सुहास दिवसे यांना लेखी स्वरूपात पीकविम्याच्या पंचनाम्यात होत असलेला गोंधळ कळविला आहे. ‘शासनाच्या आदेशानुसार पंचनाम्याच्या याद्या तात्काळ करून नुकसान भरपाई वेळीच मिळवून देण्याचे काम आमचे असताना विमा कंपन्यांचे काम आमच्याकडून करून घेण्यासाठी वरिष्ठांकडून दबाव टाकण्यात येत आहे. हे निश्चितपणे गैर आहे,’ असे संघटनेने म्हटले आहे. विमा हप्ता भरला जात असताना त्याच क्षेत्रामध्ये दरम्यानच्या कालावधीत दुसरे पीक घेतल्याची उदाहरणे समोर आली. त्यामुळे पंचनामा करताना वेगळे पीक निदर्शनास येते व विमा दुसऱ्या पिकाचा भरल्याचे दिसते. नुकसान झाल्यानंतर ४८ तासात कंपनीकडे शेतकऱ्यांनी कळविले. मात्र, विमा कंपन्यांचे प्रतिनिधी वेळेत शेतकऱ्यांपर्यंत गेलेले नाहीत. त्यानंतर शेतकऱ्यांनी पीक काढणी केली, असे संघटनेचे म्हणणे आहे. या परिस्थितीत काय निर्णय घ्यायचा हा अधिकार कंपनीचा आहे. त्यामुळे आम्हाला दबावाने व अधिकार नसतानाही सदर कामे करण्यास भाग पाडू नये. त्यामुळे शेतकऱ्यांचा सध्या असलेला रोष विनाकारण कर्मचाऱ्यांवरही ओढावू शकतो. पंचनाम्यानुसार वेळीच भरपाई मिळवून देण्याचे काम सुरू आहे. पण, विमा कंपनीच्या अनुषंगाने अडचणी बघता कोणतेही काम कृषी सहायक करणार नाहीत, असे आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

कर्मचारी काय म्हणतात 

  • राज्यात पीक पंचनामे करण्याचे काम एक नोव्हेंबरपासून सुरू होते.
  • पंचनाम्यासाठी मात्र शेतकरी याद्या विमा कंपन्यांनी दोन आठवडे उशिरा दिल्या.
  • जबाबदारी असूनही विमा कंपन्यांचे प्रतिनिधी पंचनाम्याकडे फिरकले नाहीत.
  • विमा कंपन्यांऐवजी काहीच संबंध नसलेल्या कृषी सहायकांना त्रास दिला गेला.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com