सांगली ः विष्णूअण्णा पाटील फळे व भाजीपाला दुय्यम बाजार आवारात कांद्याच्या आवकेत घट झाली. त्यामुळे दरात ४०० ते ५०० रुपयांनी वाढ झाली आहे. बाजार समितीत दररोज दीड ते दोन हजार क्विंटल कांद्याची आवक होते आहे, अशी माहिती बाजार समितीतील सूत्रांनी दिली.
बाजार समितीत सोलापूर, सातारा, नगर, पुणे या जिल्ह्यातून कांद्याची आवक होते. मात्र, डिसेंबरमध्ये मॉन्सूनोत्तर पावसामुळे कांदा भिजला. त्यामुळे कमी दर्जाचा कांदा मार्केटमध्ये सौद्याला येत होता. दरम्यान, कांद्याची आवकही अधिक होती. परिणामी कांद्याचे दर कमी झाले होते. त्यामुळे काही प्रमाणात शेतकऱ्यांना याचा फटका बसला. दर कमी झाल्याने शेतकऱ्यांनी सौदे देखील बंद पाडले होते. त्यानंतर दरात वाढ झाली. परंतु, ही दर वाढ काही दिवसासाठी राहिली.
डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात कांद्याची सरासरी ३ ते चार हजार क्विंटल आवक झाली. त्यादरम्यान कांद्यास प्रतिक्विंटल सरासरी १६०० रुपये असा दर होता. गेल्या आठवड्यापासून दर्जेदार कांदा मार्केटमध्ये येत आहे. आवकही कमी झाली आहे. त्यामुळे कांद्याच्या दरात वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यापासून बाजार समितीत दररोज दीड ते दोन हजार क्विंटल कांद्याची आवक होत आहे. डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कांद्याची आवक कमी झाली असल्याचे बाजार समितीने दिलेल्या अहवालातून दिसते आहे.
जानेवारीच्या एक तारखेला ३ हजार क्विंटलची आवक झाली होती. त्या कांद्यास सरासरी २१०० रुपये असा दर मिळाला. कांद्याची आवक जादा असली तरी, हा कांदा दर्जेदार होता. त्यामुळे अधिक दर मिळाला. दरम्यान, मंगळवारी (ता.४) कांद्याची १२०२ क्विंटल आवक झाली. दर सरासरी २२५० रुपये मिळाला. बाजारात कांद्याची आवक कमी अधिक होईल, परंतु, कांद्याचे दर स्थिर राहतील, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.