सर्पदंश झालेले जनावर बेचैन होते.हालचाल करत नाही. नाका-तोंडाद्वारे फेस गळतो,दंशाची जागा काळी-निळी होते. तातडीने लक्षणे तपासून उपचार करावेत.
सध्याच्या पावसाळी हंगामामध्ये बेडकांचा वावर जास्त असतो. अशा काळात बेडकांना खाण्यासाठी सापांचा वावर शेती आणि गोठ्याच्या परिसरात वाढतो.परंतू दिसणारा प्रत्येक साप हा विषारी असतोच असे नाही. विषारी सापांच्या या प्रजाती दोन गटात विभागल्या जातात. इलेपाईन्स या गटातील साप त्यांच्या विषाद्वारे माणूस आणि जनावरांच्या मेंदू आणि चेता संस्थेवर परिणाम करतात. उदा. नाग, मण्यार व्हायपराईन्स या गटातील साप त्यांच्या विषाद्वारे माणूस आणि जनावरांच्या हृदय आणि रक्ताभिसरण संस्थेवर परिणाम करतात. उदा. फुरसे,घोणस जनावरातील सर्पदंश
जनावरे चरताना पाय,सड,कास आणि तोंडाला सर्पदंश होण्याची शक्यता असते. साप दंश करून त्यांच्या विशिष्ट ग्रंथीतून विष जनावरांच्या शरीरात सोडतात. दंश झालेल्या जागेतून विष रक्तात मिसळते आणि विषारी परिणाम दिसू लागतो. विषाचा परिणाम हा जनावरांचे आकारमान, दंश केलेली जागा( मेंदू आणि हृदयाच्या किती अंतरावर आहे), विषाची मात्रा यावर अवलंबून असतो. सर्पदंशाची लक्षणे नाग, मण्यार चावल्यास दिसणारी लक्षणे
मेंदू व चेतासंस्थेवर परिणाम होतो. दंशाची जागा सुजून वेदनादायक बनते. स्नायू कमजोर होऊन जनावर उभे राहू शकत नाही. चारा खाण्यास त्रास होतो किंवा खाल्लेला चारा तोंडातच राहतो. पोटातील वेदनेमुळे जनावर विव्हळते. डोळ्यांच्या बुभुळांचा आकार वाढतो. अंग थरथरते, जनावर जास्त प्रमाणात लाळ गाळते. श्वसन संस्थेच्या अर्धांगवायूमुळे जनावर दगावते. घोणस, फुरसे चावल्यास दिसणारी लक्षणे
हृदय व रक्ताभिसरण संस्थेवर परिणाम होतो. दंशाची जागा चिघळून वेदनादायक बनते. दंशाची जागा काळी निळी पडते. जखमेतून रक्तासारखा चिकट द्रव पडू लागतो. कातडी थंड पडून जनावर प्रतिसाद देत नाही. अतिसार,उलट्या, फुफुसाचा दाह होतो. रक्ताभिसरण बंद पडून जनावर दगावते. जनावर वाचल्यास दंशाची जखम चिघळून जंतू संसर्ग होऊन धनुर्वात होण्याची शक्यता असते. सापाच्या दातांच्या खुणा शरीरावर असतात. दंश झालेले जनावर बेचैन होते.हालचाल करत नाही. सतत ओरडते,नाका-तोंडा द्वारे फेस गाळते,दंशाची जागा काळी-निळी होते,त्या जागेतून रक्त आणि पिवळसर रंगाचा चिकट स्राव येतो.जनावर लंगडते. भूक मंदावते. उपचार न झाल्यास जनावर दगावते. सर्पदंश झाल्यास उपचारासाठी तात्काळ पशुवैद्यकास बोलवावे. ज्या सापाने दंश केला आहे, त्याचे तोंड ठेचू नये कारण तोंडाच्या रचनेवरून साप कोणत्या प्रजातीत मोडतो ( विषारी/ बिनविषारी ) याची कल्पना येते. त्यामुळे उपचार करणे सुलभ जाते. जनावरास शांत व स्वच्छ ठिकाणी बांधावे. दंशाची जागा स्वच्छ पाण्याने आणि जंतुनाशकाने धुवावी. दंशाच्या जागेची हालचाल कमी करावी, जेणेकरून विष शरीरात गतीने पसरत नाही. विषाचा शरीरातील प्रसार कमी करण्यासाठी जखमेच्या वर काही अंतरावर दोरी किंवा कापड बांधावे. बांधलेले कापड १० मिनिटाच्या अंतराने काही सेकंदासाठी सैल करावे. दंशाची जागा चाकू किंवा धारदार शस्त्राने पसरवू नये. त्यामुळे जंतुसंसर्ग आणि धनुर्वात होण्याची शक्यता असते. जखमेवर तंबाखू लावू नये. या गोष्टी लावल्याने धमण्यांची तोंडे मोठी होतात. विष अधिकच भिनत जाते. गोठा नेहमी स्वच्छ ठेवावा. गोठ्या भोवताली अडगळ असू नये. धान्याचे कोठार आणि गोठा यामध्ये अंतर असावे. गोठ्याच्या परिसरातील उंदीर,घूस यांचा प्रादुर्भाव कमी करावा. संपर्क- डॉ.प्रविण पतंगे,९८९०७४९४२९ (पशुधन विकास अधिकारी, एटापल्ली जि. गडचिरोली)