सोलापूर : ‘‘हा जिल्हा शेती आणि शेतीवर आधारित उद्योगावर अवलंबून आहे. त्यामुळे प्रामुख्याने शेतीशी निगडीत प्रश्न सोडविण्यावर आपला भर राहील. त्यादृष्टीने जलसिंचन, कृषी उद्योग आणि पायाभूत सुविधांच्या विकासाला प्राधान्य असेल’’, अशी ग्वाही पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी येथे दिली.
प्रजासत्ताक दिनाचा मुख्य शासकीय कार्यक्रम रविवारी (ता.२६) पोलीस मुख्यालय येथे झाला. ध्वजारोहणानंतर पालकमंत्री वळसे-पाटील बोलत होते. पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर, महापालिका आयुक्त दीपक तावरे, पोलीस अधीक्षक मनोज पाटील आदी उपस्थित होते.
वळसे-पाटील म्हणाले, ‘जिल्ह्याचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. या प्रश्नांसंबंधी आपण जातीने लक्ष घालू. पंढरपूर, अक्कलकोट आणि ग्रामदैवत श्री सिध्देश्वर या तीर्थक्षेत्रांचा नियोजनबध्द विकास होईल, यासाठी अधिकचा निधी मागण्यासाठी प्रयत्नशील असू. सोलापुरातील विविध व्यवसाय आणि उद्येागांना चालना मिळण्यासाठी रस्त्यांचा विकास गतीने करण्यावर भर आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि महामार्ग विभाग विविध रस्ते विकासाच्या योजनांमधून सोलापूर आणि महत्वाच्या शहरांशी संपर्क वाढेल, यासाठी प्रयत्न करीत आहे.’’
शासकीय कामकाजात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात असल्यामूळे नागरिकांना विविध सेवा सुविधा गतीने मिळतील, अशी अपेक्षा आहे. सात-बारा संगणकीकरण, गावांची ड्रेाणद्वारे मोजणी व मालमत्ता पत्रिकांचे संगणकीकरण यांचा यामध्ये समावेश आहे, असेही त्यांनी सांगितले. या वेळी जिल्ह्यातील विविध पदाधिकारी, विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.