तीन वर्षांपासून ‘जलयुक्त’चे पुरस्कार रखडले 

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नगर  ः दुष्काळमुक्तीसाठी शासनाने राबविलेल्या जलयुक्त शिवार अभियानात अनेक गावांनी प्रभावीपणे जलसंधारणाचे काम केले. मात्र, चांगले काम करणाऱ्या गावांचा पुरस्कार देऊन गौरव करण्याची शासनाची घोषणा प्रत्यक्षात दूरच राहिली आहे. या अभियानातील गावे, संस्थांचे तब्बल तीन वर्षांचे पुरस्कार रखडले आहेत, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली. 

पुरस्काराबाबत चौकशी केल्यानंतर जलयुक्तसाठी महत्त्वाची भूमिका असलेल्या कृषी आणि जलसंधारण विभागातही त्याबाबत समन्वय नसल्याची बाब समोर आली आहे. लोक मात्र आमच्या गावाला पुरस्कार मिळणार का? याची विचारणा करत कृषी विभागाकडे चकरा मारत आहेत. मात्र, काहीही माहिती नसल्याने आलेल्यांना काय उत्तरे द्यावी, असा प्रश्न येथील अधिकाऱ्यांना पडला आहे.  

दुष्काळमुक्तीसाठी जलसंधारणाची कामे करण्यासाठी २०१५ पासून राज्यात जलयुक्त शिवार अभियान सुरू झाले. कृषी विभागाची योजनेसाठी मुख्य समन्वयाची भूमिका आहे. सतत तीन वर्ष टॅंकरने पाणीपुरवठ्यासह दुष्काळाच्या निकषानुसार जलयुक्तसाठी गावे निवडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या अभियानाचा राज्यासह देशभरात गवगवा झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अभियानाची दखल घेतली. या योजनेसाठी लोकसहभागही वाढला असल्याने योजनेतून जलसंधारणाच्या कामाला अधिक गती मिळाली.  

या अभियानात प्रभावी कामे करणाऱ्या गावांचा जिल्हा, विभाग, राज्य पातळीवर गौरव करण्यासाठी पुरस्कार देणार असल्याची घोषणा करण्यात आली. पहिल्या वर्षीचे (२०१५) चे पुरस्कार वितरण झाले. तेही घाईतही केले गेले. त्यानंतर २०१६, १७ या वर्षासाठीचे प्रस्ताव मागवले. कृषी विभागामार्फत गावांचे जिल्हा माहिती अधिकाऱ्यांमार्फत प्रस्ताव गेले. परीक्षण झाले. मात्र, त्यानंतर त्या प्रस्तावाचे काय झाले, याची माहिती कृषी विभाग, माहिती कार्यालयाकडे व प्रशासनाकडेही नाही. समन्वय कृषी विभागाकडे असले तरी पुरस्कार वितरणाचे नियोजन व अन्य बाबी जलसंधारण विभाग करते. त्यांनाही याबाबत माहिती नाही. प्रस्ताव मुंबईत आहेत एवढेच ठेवणीतले उत्तर मिळत आहे. विशेष म्हणजे २०१८ या वर्षासाठी अजून प्रस्तावच मागवले नाहीत. 

वशिलेबाजी तर होणार नाही ना? जलयुक्त शिवार अभियानाचे पहिल्या वर्षीचे पुरस्कार दिले, त्या वेळी गावांसह अन्य पुरस्कारात वशिलेबाजी झाल्याचा आरोप त्या वेळी काही गावांनी केला. आता तीन वर्षांचे पुरस्कार रखडले आहेत. या वेळी प्रभावी कामे करणाऱ्या गावांचे नागरिक पुरस्कारात आपल्या गावांचा क्रमांक लागेल का, कधी जाहीर होणार आहेत, असा प्रश्न करतानाच यंदा वशिलेबाजी तर होणार नाही ना, असे प्रश्‍नही अधिकाऱ्यांना विचारत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com