सांगली ः जिल्ह्यातील सहकारी आणि खासगी अशा १३ साखर कारखान्यांनी गळीत हंगाम सुरू केला आहे. काही कारखान्यांच्या हंगामास महिना झाला आहे; तर काहींनी दिवाळीनंतर सुरवात केली. आजअखेर या कारखान्यांनी १५ लाख २८ हजार टन उसाचे गाळप केले आहे; तर १५ लाख ५२ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. सरासरी उतारा १०.१६ इतका आहे.
जिल्ह्यात यंदा महापुराचा ऊस क्षेत्राला फटका बसला. त्यानंतर अवकाळी पाऊसही झाला. ऑक्टोबर महिन्यात गाळप करण्यास परवानगी मिळाली. काही कारखान्यांनी दिवाळीपूर्वी तर काहींनी दिवाळीनंतर हंगामास प्रारंभ केला. जिल्ह्यात गतवर्षी १५ साखर कारखाने सुरू होते; तर यंदा तासगाव आणि नागेवाडी कारखाने थकीत एफआरपीमुळे सुरू होऊ शकलेले नाहीत. महाकाली, माणगंगा, केन ॲग्रो हे कारखाने यापूर्वीच बंद पडले आहेत. त्यामुळे यंदा १३ साखर कारखान्यांनी हंगाम सुरू ठेवला आहे.
यंदाही एकरकमी एफआरपीवरून शेतकरी संघटना आणि कारखानदार यांच्यातील संघर्ष अनुभवण्यास आला. दत्त इंडिया व दालमियाने एकरकमी एफआरपी जाहीर केली. त्यामुळे इतर कारखाने देखील एकरकमी एफआरपी जाहीर करतील, अशी शक्यता होती. परंतु एकरकमी एफआरपीला यंदाही इतर कारखानदारांनी कोलदांडा दिल्याचे दिसून येते. काही कारखाने एकरकमी एफआरपी देण्यास तयार आहेत. परंतु घोषणा करण्यात त्यांना अडचणी असल्याची माहिती पुढे येते. कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांनी एकरकमी एफआरपी यंदा दिली.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.