नांदेड : ऑगष्ट-सप्टेंबर महिन्यात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यातील मोठे, मध्यम, लघू प्रकल्प, केटीवेअरसह उच्च पातळी बंधाऱ्यांत एकूण ६१५.९४ दशलक्ष घणमीटरनुसार ८२.५७ टक्के पाणीसाठा झाला आहे. मागील वर्षी यात काळात जिल्ह्यात ७५ टक्के पाणीसाठा होता, अशी माहिती नांदेड पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली.
जिल्ह्यात जूनमध्ये दमदार सुरवात केलेल्या पावसाने मध्यंतरी २२ दिवसाची उघडीप दिली होती. यामुळे पेरण्यांची कामे खोळंबली. यानंतर जुलैमध्ये मात्र पावसाने जोरदार सुरवात केली. मागची कसर भरून काढली. दरम्यानच्या काळात काहीसा मंदावलेला पावसाने ऑगष्ट-सप्टेंबरमध्ये जोर धरला. त्यामुळे जिल्ह्यात लहान-मोठ्या नंद्यासह नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला.
या पावसामुळे खरिपातील लाखो हेक्टरवरील पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जिल्ह्यात आजपर्यंत ९९३ मिलीमीटरनुसार १११.४१ टक्के पावसाची नोंद झाली.
अतिवृष्टीमुळे नांदेड शहराजवळील मोठा प्रकल्प असलेल्या विष्णुपुरीत पाण्याचा येवा वाढला. यातून जवळपास ३० हजार दशलक्ष घनमीटर पाणी नदीत सोडण्यात आले. सध्या यात शंभर टक्के पाणीसाठा आहे. जिल्ह्यातील दुसरा मोठा प्रकल्प असलेल्या मानार (बारुळ) प्रकल्पही पूर्ण क्षमतेने भरला आहे.
यासोबतच जिल्ह्यातील नऊ मध्यम प्रकल्पांत ९८ टक्के, ८८ लघू प्रकल्पांत ९४.९४ टक्के, नऊ उच्च पातळी बंधाऱ्यांत ४१.३६ टक्के असा एकूण ६१५.९४ दशलक्ष घनमीटरनुसार ८२.५७ टक्के पाणीसाठा झाला आहे. नांदेड जिल्ह्याशेजारी असलेल्या परभणी जिल्ह्यातील येलदरी व सिद्धेश्वर तसेच यवतमाळ जिल्ह्यातील ऊर्ध्व पेनगंगा (इसापूर) हे मोठे प्रकल्प पूर्ण क्षमनेते भरले. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील लाभ क्षेत्राला यंदा रब्बीमध्ये पूर्ण पाणी पाळ्या मिळणार आहेत.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.