नाशिक : ‘‘जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर विविध प्रकारच्या रानभाज्या उपलब्ध होतात. त्याचे आरोग्यसंबंधी असलेल्या मूल्यांचा प्रचार-प्रसार करणे, आदिवासी भागातील घटकांना रोजगार उपलब्ध करून देऊन थेट उत्पादक ते ग्राहक''अशी साखळी जोडून एक दुवा होण्याचे काम आठवडी बाजार करेल’’, असा विश्वास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी व्यक्त केला.
जिल्हा परिषदेच्या वतीने रानभाजी आठवडी बाजाराची सुरुवात रविवारी (ता.२३) नाशिक पंचायत समिती आवार येथे करण्यात आली. जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांच्या हस्ते आठवडी बाजाराचा प्रारंभ करण्यात आला. पंचायत समिती सभापती विजया कांडेकर, उपसभापती ढवळू फसाळे, कृषी विकास अधिकारी रमेश शिंदे, गट विकास अधिकारी सारिका बारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
बनसोड म्हणाल्या, ‘‘व्यावसायिक दृष्ट्या ग्राहकांपर्यंत रान भाज्यांची उपलब्धता करून दिल्यास उपयुक्त ठरेल. यासाठी ही संकल्पना जिल्हा परिषदेद्वारे राबवण्यात आलेल्या येत आहे. यापूर्वी ‘उपजीविका संवर्धन’ या विषयावर काम केल्याचा अनुभव यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल. आदिवासी भागातील मसाले, हातसडीचा तांदुळ यांच्याही विक्रीसाठी प्रयत्न करण्यात येईल.’’
नाशिक, पेठ, त्र्यंबकेश्वर या आदिवासी भागातील शेतकरी व महिला विक्रीसाठी आल्या होत्या. पहिल्याच दिवशी २८ हजार रुपयांची उलाढाल झाली.
कायम विक्रीसाठी पुढाकार
नाशिक पंचायत समितीसमोर जागा उपलब्ध आहे. त्यामुळे एकाच ठिकाणी रानभाज्यांची उपलब्धता व्हावी, यासाठी हे ठिकाण निवडल्याचे सांगण्यात आले. शहराच्या मध्यवर्ती भागात आदिवासी बांधवांना व ग्राहकांना खरेदी-विक्री सोपी व्हावी, यासाठी ही जागा निवडण्यात आली आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.