जमिनीत मुक्त चुना वेड्यावाकड्या खड्यांच्या आणि भुकटीच्या स्वरुपात आढळून येतो. अशा जमिनी पांढऱ्या, भुरकट रंगाच्या दिसतात. या दोन्ही चुन्याच्या प्रकारात भुकटीच्या स्वरुपात मातीत चुनखडीचे प्रमाण दहा टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास पिकांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम दिसून येतात. राज्यामध्ये कोकण वगळता पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भामध्ये चुनखडीयुक्त जमीन आढळतात. विशेषत: अवर्षणप्रवण क्षेत्र, जास्त उष्णता, कोरडे हवामान, कमी पाऊस, तसेच बेसाल्ट खडकापासून तयार झालेल्या विम्लधर्मीय जमिनीतील मातीमध्ये मुक्त चुन्याचे प्रमाण कमी-अधिक प्रमाणात दिसून येते. अशा जमिनींचा सामू आठपेक्षा जास्त असतो. जमिनीची विद्युत वाहकता एक डेसी सायमन प्रति मीटरपेक्षा कमी असते. अशा जमिनीतून नत्र, स्फुरद, पालाश व सूक्ष्म अन्नद्रव्यांची उपलब्धता कमी होते, पिकांची वाढ खुंटते. अशा जमिनी या फळबाग लागवडीस योग्य नसतात.
जमिनीत मुक्त चुना वेड्यावाकड्या खड्यांच्या आणि भुकटीच्या स्वरुपात मातीत आढळून येतो. म्हणून अशा जमिनी पांढऱ्या, भुरकट रंगाच्या दिसतात. या दोन्ही चुन्याच्या प्रकारात भुकटीच्या स्वरुपात मातीत चुनखडीचे प्रमाण दहा टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास पिकांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम दिसून येतात. सिंचन क्षेत्रात हलक्या जमिनीत मुक्त चुना पृष्ठभागाखालील मुरुमाच्या थरात जाऊन साठतो. चोपण जमिनीत सामू ८.५ पेक्षा जास्त असलेल्या जमिनीतील खालच्या थरात चुनखडीचे थर दिसून येतात. असे चुनखडीचे थर एक मीटरच्या आत दिसून आल्यास फळबाग लागवडीसाठी जमीन योग्य नसते. किंबहुना फळबागेचे आयुष्य कमी हाऊन उत्पादकता कमी होते. फळबाग लागवड करताना खड्डे घेऊन असे चुनखडीचे थर १५ सेंमी पेक्षा जास्त रुंदीचे थर एक मीटरच्या आत साठलेले नसावेत. अन्यथा फळबाग लागवड यशस्वी होत नाही. योग्य प्रमाणात मुक्त चुन्याचा साठा जमिनीत असणे ही महत्त्वाची बाब आहे. पिकाखालील बागायती जमिनीत मुक्त चुन्याचे (चुनखडी) प्रमाण शेकडा ३ पासून २० ते २५ पर्यंत आढळते. हे प्रमाण जेवढे जास्त तेवढे जमिनीचे व्यवस्थापन करणे कठीण जाते. मुक्त चुन्याचे प्रमाण योग्य असेल (३ ते ५ टक्के) तर जमिनीची घडण रवाळ बनण्यास मदत होते. हवा व पाणी यांचा समतोल राहून पिकांची वाढ होते. जमिनीचा धूप काही प्रमाणात कमी होते.| जमिनीची सुपीकता टिकून रहाते. मातीचे पाणी धरून ठेवण्याचे प्रमाण वाढते, पाण्याचा योग्य निचरा होतो. हलक्या जमिनीची घडण सुधारल्याने सूक्ष्मजीवाणूंची वाढ मोठ्या प्रमाणात होते. जमीन सुपीक बनते. जमिनीतील नत्र स्थिर करण्याचा वेग वाढतो. आम्ल जमिनीत मुक्त चुन्यामुळे पिकास स्फुरद अन्नद्रव्ये मिळण्यास मदत होते.चिकण मातीचे लहान लहान कण एकत्रित बांधले जातात. मुक्त चुन्याचे प्रमाण योग्य असल्यास जमिनीतून सेंद्रिय पदार्थ वाहून जात नाहीत. त्यांचा चुन्याशी संयोग होऊन कॅल्शियम ह्युमेट तयार होते. त्यामुळे सेंद्रिय पदार्थ जमिनीत घट्ट धरून ठेवले जातात. त्यामुळे जमिनीला गडद तपकिरी, काळा रंग येतो. चुनखडीयुक्त जमिनींचे गुणधर्म
जमिनीचा रंग भुरकट पांढरा दिसून येतो. जमिनीची घनता वाढते म्हणजेच जमिनीची घडण कडक बनते. त्यामुळे बियाण्याची उगवण कमी होते. पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी असते. मातीचा सामू विम्लधर्मीय (सामू ८ पेक्षा जास्त), तर क्षारांचे प्रमाण कमी असते. मातीत मुक्त चुन्याचे प्रमाण १० टक्क्यांपेक्षा जास्त असते. हेच प्रमाण १५ टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास पिकांना, फळपिकांना हानिकारक ठरते. उपलब्ध मुख्य अन्नद्रव्ये (नत्र, स्फुरद, पालाश), दुय्यम अन्नद्रव्ये (मॅग्नेशियम, गंधक) आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांची (लोह, जस्त, बोरॉन) उपलब्धता कमी होते. लोहाच्या कमतरतेमुळे पिकांची पाने पिवळी पडून शिरा हिरव्या राहतात. पाने पिवळी पडून वाळतात. पिकांची वाढ खुंटते. कोरडवाहू क्षेत्रात चुनखडीच्या जमिनी आढळून येतात. चुनखडीयुक्त जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी असल्याने वाळवी, हुमणी, सूत्रकृमींचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळून येतो. संपर्कः प्रियंका दिघे, ९६६५५१२३५८ (कृषी महाविद्यालय, लोणी, जि. नगर)