शेतकरी पुरस्कारासाठी दाखल केलेले प्रस्ताव पाठवले परत

गेल्या वर्षी सादर केलेले प्रस्ताव यंदा काढलेल्या नव्या नियमानुसार नसल्याचे कारण देत परत पाठविण्यात आले असून, हे प्रस्ताव शेतकऱ्यांकडून सुधारित पाठवावेत, असे कृषी विभागाकडूनकळविण्यात आले आहे.
शेतकरी पुरस्कारासाठी दाखल केलेले प्रस्ताव पाठवले परत
शेतकरी पुरस्कारासाठी दाखल केलेले प्रस्ताव पाठवले परत

अकोला : शेतीत विविध प्रयोग करणाऱ्या, उत्पादन वाढीतून आर्थिकदृष्‍ट्या सक्षम होण्यासाठी प्रयत्नरत असलेल्या शेतकऱ्यांच्या पाठिवर कृषी विभागाच्या पुरस्कारातून कौतुकाची थाप पडत असते. म्हणूनच दरवर्षी शेकडोच्या संख्येने शेतकरी या पुरस्कारांसाठी प्रस्ताव सादर करीत असतात. मात्र गेल्या वर्षी सादर केलेले प्रस्ताव यंदा काढलेल्या नव्या नियमानुसार नसल्याचे कारण देत परत पाठविण्यात आले असून, हे प्रस्ताव शेतकऱ्यांकडून सुधारित पाठवावेत, असे कळविण्यात आले आहे. जवळपास वर्षभरानंतर हा प्रकार घडल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. कृषी विभागाकडून कृषिभूषण, जिजामाता कृषिभूषण, सेंद्रिय शेती कृषिभूषण, शेतीमित्र, शेतीनिष्ठ अशा विविध प्रकारचे पुरस्कार देण्यात येतात. या पुरस्कारासाठी शेतकरी प्रस्ताव सादर करतात. अशाच प्रकारे गेल्या वर्षात जिल्ह्यातील आठ ते दहा शेतकऱ्यांनी पुरस्कारासाठी जिल्ह्याच्या कृषी विभागामार्फत विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवले होते. यासाठी अनेकांनी हजारोंचा खर्चही केला. कागदपत्रांची जुळवाजुळव केली. प्रस्ताव दाखल केलेल्या शेतकऱ्यांची समित्यांनी भेट देऊन शिफारससुद्धा केली होती. अशा प्रकारच्या संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करीत हे प्रस्ताव देण्यात आले होते.  मध्यंतरी शासनाकडून शेतकऱ्यांच्या पुरस्कारांची घोषणाही करण्यात आली होती. त्यामध्ये जिल्ह्यातून दाखल केलेल्या प्रस्तावांमधील शेतकऱ्यांची नावे दिसून आली नव्हती. परिणामी, शेतकऱ्यांमध्ये आपले नाव कधी येईल याबाबत उत्सुकता बनलेली होती. असे असताना, आता मात्र कृषी विभागाकडून त्यांचे प्रस्ताव फेटाळत परत पाठवण्यात आले आहेत. हे प्रस्ताव यंदा फेब्रुवारी महिन्यात काढलेल्या नव्या नियम, प्रपत्रानुसार नसल्याचे कारण देण्यात आले. संबंधितांचे प्रस्ताव नव्या नियमानुसार द्यावेत, असेही सुचविण्यात आल्याचे समजते. आता या शेतकऱ्यांना पुन्हा प्रस्ताव बनविण्यासाठी खर्च करावा लागेल.  प्रस्ताव २०२० मध्ये, नियम आला २०२१ मध्ये ! मिळालेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांनी पुरस्कारासाठी २०२० मध्ये प्रस्तावाच्या फाइल कृषी विभागाकडे सादर केल्या होत्या. तर शासनाचे नवे परिपत्रक यंदा फेब्रुवारी महिन्यात आले. त्यामुळे नवीन नियम लागू होण्याआधी दाखल केलेल्या प्रस्तांवाना फेटाळण्याचे नेमके कारण काय, असा प्रश्‍न आता शेतकरी विचारत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com