सौरऊर्जा प्रकल्पासाठी मागविले प्रस्ताव
सौरऊर्जा प्रकल्पासाठी मागविले प्रस्ताव

सौरऊर्जा प्रकल्पासाठी मागविले प्रस्ताव ः डाॅ. कराड

औरंगाबाद : मराठवाड्यात सौरऊर्जा प्रकल्पाअंतर्गत जायकवाडीच्या पाण्यावर हा प्रकल्प उभारण्याकरिता प्रयत्न सुरू आहेत. येत्या १५ दिवसांत विविध कंपन्यांकडून त्याविषयी प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. या प्रस्तावावर तज्ज्ञ समिती अभ्यास करुन हा अभ्यासपूर्ण प्रस्ताव मराठवाडा विकास मंडळाच्या वतीने राज्यपाल यांना सादर करण्यात येणार असल्याचे मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड यांनी सांगितले.

मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड यांच्या अध्यक्षतेखाली समितीची बैठक वैधानिक विकास मंडळाच्या शुक्रवारी (ता. २४) सभागृहात पार पडली. या वेळी डॉ. कराड बोलत होते.

बैठकीला सदस्य सचिव डी. एम. मुगळीकर, मंडळाचे तज्ज्ञ सदस्य शंकरराव नागरे, महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकर (महाऊर्जा) चे श्री. रोडे, महावितरणचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर, महापारेषणचे अधीक्षक अभियंता अनिल भारसाकळे, सोलर (महाजेनको)चे कार्यकारी अभियंता ए. एस. लोणे, लाभक्षेत्र विकासचे सहायक मुख्य प्रशासक मोहम्मद मुश्‍ताख, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता ब. द. जटाळे, आदी संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

डॉ. कराड म्हणाले, या सौरऊर्जा प्रकल्पामुळे पाण्याचे बाष्पीभवन रोखता येणार आहे. तसेच या प्रकल्पाकरिता जमिनीचीही आवश्‍यकता भासणार नाही. सौरऊर्जेचा वापर करून पाणीवाटप करता येईल का? याकरितादेखील तज्ज्ञ समिती अभ्यास करणार आहे. केंद्र सरकारने राज्याला अटल सौर कृषी पंप योजनेत १० हजार कृषी पंप दिले. त्यापैकी ९९१ कृषी पंप मराठवाड्यात बसविले आहेत. नव्याने सौर कृषी पंप योनजेअंतर्गत केंद्र सरकारकडून राज्यासाठी ७ हजार कृषी पंप सौरऊर्जेच्या माध्यमातून बसविण्याला मान्यता दिली आहे.

राज्य शासनाकडून ५० हजार सौर कृषी पंप बसविणे विचाराधीन आहे. महाराष्ट्रात अकरा हजार मेगा युनिट विजेचा वापर होतो. विजेचा वापर हा खर्चिक आहे, म्हणूनच याला पर्याय म्हणून शासनाने सौरऊर्जा प्रकल्प अंतर्गत नव्याने अटल सौर कृषी पंप योजना आणली अाहे. या वेळी शाळा, स्थानिक स्वराज्य संस्था, एमआयडीसी, डीएमआयसी यांना सौरऊर्जेच्या माध्यमातून पाणी वाटपासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.

सौर ऊर्जा प्रकल्प मोठ्या प्रमाणात केवळ केरळमध्ये असून, याच धर्तीवर महाराष्ट्रात हा प्रकल्प मोठ्या प्रमाणात उभारण्यात येणार आहे. अटल सौर कृषी पंप योजनेचा लाभ विशेषत: दुर्गम भागातील शेतकरी, आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांना घेता येईल. याकरिता केंद्रशासनाकडून २० ते २५ टक्के अनुदानही मिळणार आहे. ग्रामीण विद्युतीकरण संस्थेचा संचालक या नात्याने सी. एस. आर. मधून मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मोफत सौरऊर्जा पंप देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार अाहे. - डॉ. भागवत कराड, अध्यक्ष, मराठवाडा वैधानिक विकास मंडळ

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com