ग्राम पातळीवर शेतकऱ्यांना कृषी निविष्ठा पुरवा : कृषी आयुक्तांचे पत्र

या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना बियाणे, खते, कीटकनाशकांचा पुरवठा वेळेवर होणे गरजेचे आहे. कोरोनामुळे प्रत्येक जिल्ह्यात संचारबंदी सुरु आहे.
urea
urea

अकोला ः या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना बियाणे, खते, कीटकनाशकांचा पुरवठा वेळेवर होणे गरजेचे आहे. कोरोनामुळे प्रत्येक जिल्ह्यात संचारबंदी सुरु आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी कृषी केंद्रांवर जाऊन कृषी निविष्ठा खरेदी केल्यास गर्दी होऊ शकते. यातून विषाणूचा फैलाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना ग्राम पातळीवर कृषी निविष्ठा पुरविण्याचे नियोजन करण्याचे निर्देश कृषी आयुक्तांनी यंत्रणांना दिले आहेत.  याबाबत कृषी आयुक्तांनी सोमवारी (ता.२७) एक सविस्तर पत्र विभागीय कृषी सहसंचालक तसेच सर्व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना पाठवले आहे. यात म्हटले की, राज्यातील खरीप नियोजनाबाबत सर्व जिल्ह्यांच्या आढावा बैठका व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात आल्या. खरीप हंगाम लवकर सुरू होत असल्याने शेतकऱ्यांना बियाणे, खते आणि कीटकनाशकांचा पुरवठा सुद्धा वेळेत होणे आवश्यक आहे.  राज्यामध्ये कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्व जिल्ह्यांमध्ये सध्या संचारबंदी जाहीर करण्यात आली असून, अशा स्थितीत शेतकऱ्यांनी कृषी सेवा केंद्रांवर येऊन कृषी निविष्ठा खरेदी केल्यास जास्त गर्दी होऊ शकते. कोरोना विषाणूचा फैलाव मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. त्यामुळे ज्याप्रमाणे शेतकरी गटांमार्फत भाजीपाल्याचा पुरवठा शहरांमध्ये कृषी विभागाच्या समन्वयाने करण्यात आला, त्याच धर्तीवर कृषी सेवा केंद्र आणि शेतकरी गट/शेतकरी उत्पादक कंपनी यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कृषी निविष्ठांचा पुरवठा शेतावर करण्याचे बैठकीत नियोजन आखण्यात आले. त्यानुसार लवकरात लवकर कार्यवाही करावी.  यासाठी शेतकऱ्यांनी त्यांच्या भागातील आत्माअंतर्गत गटाकडे नोंदणी करावी. शेतकऱ्यांनी त्यांचे नाव, पत्ता, सर्वे नंबर/गट नंबर, मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक, ज्या कृषी सेवा केंद्रामधून निविष्ठा खरेदी करायच्या आहेत त्यांचे नाव व कृषी निविष्ठांची मागणी गटाकडे करावी. निविष्ठांची नोंदणी गटांकडे झाल्यानंतर गटप्रमुखच बियाणे, खते, कीटकनाशकांची खरेदी करतील. ज्या विक्रेत्यांना शक्य असेल ते मोबाईल ॲप तयार करून शेतकऱ्यांची मागणी नोंदवून घेतील व मोठी मागणी असल्यास कृषी निविष्ठा थेट शेतकऱ्यांपर्यंत पोचवतील.  वाहतूक परवाने देणार  कृषी सेवा केंद्र ते शेतकरी गट या वाहतुकीकरिता कृषी विभागाचे अधिकारी परवाने कृषी विभागामार्फत गटांकरिता उपलब्ध करून देतील. मात्र आर्थिक बाबी शेतकरी गटामार्फत हाताळण्यात येतील. तालुका स्तरावर यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखून ३१ मे पूर्वी शेतकऱ्यांना निविष्ठांचा पुरवठा होईल असे नियोजन करावे, असेही आयुक्तांनी म्हटले आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com