माती परिक्षण अहवाल प्राप्त झाल्यानंतर जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्यांची माहिती मिळते. त्यानुसार पिकांची निवड व खतांचे व्यवस्थापन करता येते. जमिनीचे आरोग्य टिकविण्यासाठी पोषक घटकांची आवश्यकता असते. यामध्ये प्रामुख्याने उपलब्ध नत्र, उपलब्ध स्फुरद, उपलब्ध पालाश, सूक्ष्म अन्नद्रव्ये- लोह, जस्त, मंगल, तांबे इ. तसेच सेंद्रिय कर्ब, जमिनीचा सामू, विद्राव्य क्षारांचे प्रमाण ही माहिती माती परीक्षणातून मिळते. यातून कोणत्या पिकाची निवड करावी हे सुध्दा लक्षात येते. शास्त्रशुद्ध पध्दतीचा अवलंब केल्यास उपलब्ध अन्नद्रव्य घटकांचे योग्य प्रमाण लक्षात येते. यासाठी पिके काढल्यानंतर किंवा पेरणीपूर्वी तसेच खते देण्यापूर्वी किंवा खते दिल्यानंतर तीन महिन्यांनी मातीचा नमुना घ्यावा.
जमिनीची एकरूपता, रंग, सुपीकता, जमिनीचा खडकाळपणा, उंचसखलपणा लक्षात घेऊन वेगवेगळे भाग पाडावेत. मोठ्यात मोठा भाग हा पाच एकरपेक्षा मोठा नसावा. एका प्रातिनिधीक नमुन्यासाठी कमीतकमी सात ते जास्तीत जास्त अठरा मातीचे नमुने गोळा करावे. नमुना घेताना रस्त्यालगतचा, झाडाखालचा, गोठ्याजवळचा, बांधाजवळचा किंवा घराजवळच्या जागेतून घेवू नये. नमुना घेण्यासाठी इंग्रजी व्ही आकाराच्या आकृती प्रमाणे २० सें.मी. खोल खड्डा करावा. त्या खड्यातील माती बाहेर काढून टाकावी. माती परीक्षणासाठी खड्याच्या कडेची माती काढून प्लॅस्टिक घमेल्यामध्ये घ्यावी. सर्व खड्यातून जमा केलेल्या मातीतून खडे, पालापाचोळा, कचरा बाजूला काढावा. ही माती ताडपत्रीवर मिसळून घ्यावी. त्यानंतर त्याचे चार भाग करावे. समोरासमोरील भागाची माती काढून टाकावी व पुन्हा राहिलेल्या मातीचे चार भाग करावे, परत समोरासमोरील भाग काढून टाकावे ही कृती माती अर्धा किलो शिल्लक असे पर्यंत करावी. हा नमुना सावलीत वाळवून कापडी पिशवीत भरून माती परिक्षण प्रयोग शाळेत पाठवावा. नमुन्यासोबत शेतकऱ्यांनी त्यांची सर्व माहिती त्यासोबत देणे आवश्यक ठरते. यामध्ये नमुना क्र. शेतकऱ्याचे नाव, पत्ता, नमुना घेतल्याचा दिनांक, घेतलेल्या पिकाची माहिती इ. गोष्टींचा उल्लेख असावा. माती परिक्षण अहवाल प्राप्त झाल्यानंतर जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्यांची माहिती मिळते. त्यानुसार पिकांची निवड व खतांचे व्यवस्थापन करता येते. अन्नद्रव्य कमतरतेच्या समस्या
अन्नद्रव्यांचा ऱ्हास आणि अन्नद्रव्यांचा असमतोल भारी काळ्या जमिनी,चुनखडीयुक्त, क्षारयुक्त आणि चोपण जमिनी खतांची कार्यक्षमता वाढविण्याच्या पध्दती
तृणधान्य पिकांसाठी ४:२:२:१ (नत्र:स्फुरद:पालाश:गंधक) या प्रमाणात आणि कडधान्यासाठी १:२:१:१ प्रमाणात खताचा वापर करावा. माती परीक्षणावर आधारीत शिफारशीनुसार खतांचा वापर करुन अन्नद्रव्यांचे संतुलन साधावे. सूक्ष्मअन्नद्रव्यांचा वापर फवारणीद्वारे करावा. पिकांचे अवशेष व हिरवळीच्या खतांचा वापर करावा. रासायनिक खतांचा वापर सेंद्रिय खतांसोबत(कंपोस्टखत, गांडूळखत, शेणखत) करावा. सेंद्रिय खतांचा नियमित वापर करुन जमिनीचा सामू ६.५ ते ७.५ दरम्यान आणावा. जिवाणू खतांचा वापर करावा. (रायझोबियम, पीएसबी, ॲझोटोबॅक्टर इ.) समस्यायुक्त क्षारयुक्त व चोपण जमिनीत भूसुधारकांचा (जिप्सम, सेंद्रिय खते, पेंडी खत, प्रेसमड, उसाची मळी) वापर करावा. चुनखडी विरहीत जमिनीमध्ये जीप्समचा वापर करावा. मृद व जलसंधारण पध्दतीचा अवलंब करावा. संपर्क- डॉ. हनुमान गरुड, ७५८८६७७५८३ (विषय विषेशज्ञ (कृषि विद्या),कृषि विज्ञान केंद्र खामगाव,जि.बीड)