राज्यात कडधान्याचे क्षेत्र दहा लाख हेक्टरने वाढले

कडधान्य लागवड क्षेत्रावर दुष्काळाचा आणि बदलत्या वातावरणाचा परिणाम होताना दिसत आहे. यंदा मात्र क्षेत्र वाढले आहे. कडधान्याची मागणी पाहता विद्यापीठाने क्षेत्र आणि उत्पादनवाढीसाठी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. मराठवाडा, विदर्भातील कोरडवाहू भागासाठी नवे वाण देण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न आहे. - डॉ. एन. एस. कुटे, कडधान्य सुधार प्रकल्पप्रमुख, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
Pulses
Pulses

नगर ः मागील दोन वर्षात राज्यात पडलेल्या दुष्काळाचा कडधान्य उत्पादनावर परिणाम झाला आणि क्षेत्रात घट झाली. मात्र, आता पुन्हा राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून कडधान्याचे क्षेत्र आणि उत्पादनवाढासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदा कडधान्याचे साधारण दहा लाख हेक्टर क्षेत्र वाढले आहे. तर, हरभऱ्याचे क्षेत्र सात लाख हेक्टरने वाढले.  राहुरी कृषी विद्यापीठाने आतापर्यंत कडधान्याचे २९ वाण प्रसारित केले असून त्यात हरभऱ्याचे १३ वाण आहेत. यंदा खास कोरडवाहू क्षेत्रासाठी आणि बदलत्या हवामानावर मात करणाऱ्या हरभऱ्याचे साधारण पाच वाण प्रसारित करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात आले.  राज्यातील मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात कडधान्याचे क्षेत्र मोठे असते. गेल्या पाच वर्षांत मात्र सततच्या दुष्काळाचा कडधान्य क्षेत्रावर परिणाम झाला. नेहमीच्या तुलनेत या दोन वर्षांत पंधरा ते सतरा लाख हेक्टर क्षेत्रावर घट झाली. यंदा मात्र पाऊस चांगला झाल्याने पुन्हा कडधान्याच्या क्षेत्रात राज्यात चांगली वाढ झाली आहे. हरभऱ्याचे राज्यात सरासरी १६ ते १७ लाख हेक्टर क्षेत्र असते. यंदा सुमारे तेवीस लाख हेक्टरवर हरभऱ्याची पेरणी केली आहे. तुरीचे राज्यात साधारण १० ते १२ लाख हेक्टर क्षेत्र असते. यंदा ते चौदा लाखापर्यंत गेले आहे. याशिवाय मूग, उडीद, मटकी, चवळी, कुथली, घेवड्याचे मिळून साधारण पाच लाख क्षेत्र असते. ते यंदा सात लाखाच्या जवळपास आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने हरभऱ्याचे आतापर्यंत १३ वाण विकसित केले आहेत. त्यात १९९३ ला विजय, २००६ साली दिग्विजय व २०१६ साली फुले विक्रम वाणाचा समावेश आहे. या वाणांमुळे उत्पादनवाढीला मदत होत आहे. २०१७ साली विकसित केलेल्या विक्रांत वाणाला यंदा पाच राज्यात विक्रीला परवानगी मिळाली. हर्वेस्टरने काढण्यात येणारा राज्यातील पहिला व देशातील पाचवा वाण असून या वाणामुळे उत्पादन वाढ तर होतेच, पण खर्चातही बचत होत असल्याचे सांगण्यात आले. तुरीचे तीन, मूग, मटकीचे प्रत्येकी २, चवळीचे ४, कुलथीचे ३, घेवड्याचे तीन असे कडधान्याचे २९ वाण आतापर्यत प्रसारित केले आहेत.  यंदा हेक्टरी उत्पादकता १२०० किलोवर २०१७-१८ वर्षात राज्यात कडधान्याचे क्षेत्र ४३ लाख ५२ हजार हेक्टर होते. त्यावर्षी ४५ लाख ८४ हजार टन उत्पादन झाले आणि उत्पादकता प्रति हेक्टरी ७५९ किलो होती. गेल्या वर्षी (२०१९-१९) दुष्काळाचा पारिणाम होऊन ३५ लाख ८ हजार हेक्‍टरवर पेरणी झाली आणि २० लाख ७५ हजार टन उत्पादन व हेक्टरी उत्पादकता ५९१ किलो आली. यंदा उत्पादकता हेक्टरी १२०० किलोवर जाण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com