बुलडाणा : संग्रामपूर तालुक्यात २७ जूनच्या पहाटे प्रचंड प्रमाणात अतिवृष्टी झाली होती. आता पुन्हा ३० जूनच्या रात्री अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांची शेकडो एकर जमीन खरडून गेली. याचे २४ तासांत पंचनामे करावेत, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने प्रशासनाला दिला आहे.
अतिवृष्टी झाल्याने कापूस, तूर, ज्वारी, मका, सोयाबीन, केळी यांसारख्या पिकांचे नुकसान झाले आहे. परंतु प्रशासनाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यास अजूनही सुरुवात न केल्याने संतापलेल्या शेतकऱ्यांना सोबत घेऊन तहसीलदार यांना २४ तासांत पंचनाम्याला सुरुवात न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष अनंता मानकर यांनी निवेदनातून दिला आहे.
तालुक्यातील बावनबीर, एकलारा बानोदा, सोनाळा पलसोडा, पंचाळा, उमरा, हिगंणा, काकनवाडा, खळद, वरवट, वानखेड, दुर्गादैत्य, वरवट बकाल, मनार्डी, जस्तगाव, उकडगाव, पातुर्डा, सावळा, आवार व इतर गावांमध्ये प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी पूर्णपणे खचून गेले आहेत. परंतु अजूनही प्रशासनाने नुकसानीच्या पंचनाम्याला सुरुवात केली नाही. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या नेत्तृत्वात आंदोलनाचा इशारा दिला आहे.
या निवेदनावर युवा जिल्हाध्यक्ष अंनता मानकर, तालुकाध्यक्ष योगेश मुरुख, प्रवीण येनकर, आशिष नांदोकार, रमेश ईलामे, शिवा पवार, राधेशाम घायल, कपिल गायकी, भारत सोनटक्के, बळिराम खराटे, राजू घायल, कैलास लोणाग्रे, शेख शकील, पंकज करणकार यांच्यासह बहुतांश शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.