पुणे :‘‘लांबलेला मॉन्सून, सततचा कोसळणारा वादळी पाऊस, यामुळे उत्तर पुणे जिल्ह्यातील बटाट्याचे आगार असलेल्या सातगाव पठार (ता. आंबेगाव) परिसरात हजारो हेक्टर क्षेत्रावरील बटाटे सडली आहेत. त्यामुळे मेठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे कृषी विभागाने सुरु केले आहेत’’, अशी माहिती आंबेगाव तालुक्याचे कृषी अधिकारी टि. के. चौधरी यांनी दिली.
सातगाव पठार भागातील पारगावतर्फे खेड, कुरवंडी, कोल्हारवाडी, थुगांव, भावडी, कारेगाव, पेठ, श्रीरामनगर तसेच निघोटवाडी आदी गावांत अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. सातगाव पठार भागातील शेतकऱ्यांचे मुख्य पीक बटाटा आहे. तेच पूर्णपणे खराब झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.
शेतकऱ्यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी केली होती. त्यानुसार या नुकसानींचे पंचनाम्याचे काम सुरू आहे. त्यासाठी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान, शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करुन सुमारे ४०० कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कृषिमंत्री दादा भुसे यांना पत्र लिहिले. त्याद्वारे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई मिळण्याची मागणी केली आहे.
सातगाव पठारावरील शेतकऱ्यांचे निसर्गाच्या अवकृपेमुळे मोठे नुकसान झाले. ज्या पिकावर येथील शेतकऱ्यांचे संपूर्ण वर्षाचे आर्थिक गणित अवलंबून असते, तेच पीक हातचे गेल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. - विकास बारवे, उपसरपंच, कुरवंडी, ता. आंबेगाव.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.