अमरावती ः खरिपाच्या पार्श्वभूमीवर कापूस खरेदीला गती यावी याकरिता आठ केंद्रावरील जिनींगची संख्या १८ वरून २५ पर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यानंतरही कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करीत कापूस खरेदी गतीने पूर्ण करावी, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिले.
कापूस खरेदी विषयक आढावा बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले. जिल्हाधिकारी शैलेश नवाल, राज्य पणन महासंघाचे अध्यक्ष अनंतराव देशमुख, जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव, कृषी अधिकारी यांच्याशी चर्चा करून त्यांनी खरेदी संदर्भातील अडचणींची माहिती घेतली. काही जिनींग सुरू झाल्यास त्यासोबतच मनुष्यबळ उपलब्ध झाल्यास कापूस खरेदीची गती वाढेल, असे त्यांना सांगण्यात आले.
त्यानुसार जिल्हाधिकारी शैलश नवाल यांनी दहा कृषी पर्यवेक्षकांच्या सेवा अधिग्रहित केल्या. या सर्व पर्यवेक्षकांना ग्रेडिंगबाबत प्रशिक्षण देण्यात आले. पणन महासंघाला हे प्रशिक्षित मनुष्यबळ प्रशासनाकडून उपलब्ध करून देण्यात आले आहे. गेल्या आठवड्यापासून त्यांना फिल्डवर नेमण्यात आले. त्यामुळे सात आणखी जिनींग सुरू होऊ शकल्या. पूर्वीची १८ जीनची संख्या आता २५ वर पोचली आहे. त्यामुळे कापूस खरेदीला वेग येत आहे.
आत्तापर्यंत २२ हजार २०४ शेतकऱ्यांकडून सुमारे सहा लाख २५ हजार क्विंटल कापूस खरेदी झाल्याची माहिती यावेळी जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव यांनी दिली. जिल्ह्यात एकूण आठ केंद्र असून त्यातील धामणगाव येथील केवळ एक सीसीआयचे आहे. उर्वरित पणन महासंघाची केंद्र आहेत. कापसाचा हमीभाव ५५५० रुपये असून कोरोना प्रतिबंधात्मक उपायांचे पालन खरेदीच्यावेळी केले जाते, अशी माहिती देण्यात आली.
कापूस खरेदी गतिमान व्हावी याकरिता शेतकऱ्यांकडून सातत्याने मागणी होत होती. त्याची दखल घेत जिनींगची संख्या वाढविण्यात आली आहे. त्यामुळे खरेदी प्रक्रियेला गती येत शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. - यशोमती ठाकूर, महिला व बालविकास मंत्री
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.