पंचनाम्याची प्रक्रिया संशयास्पद : बियाणे उद्योगातील सूत्र

राज्यातील सोयाबीन बियाणे उगवणीबाबत कंपन्यांवर सरसकट कारवाई करण्यापूर्वी कृषी विभागाकडून वस्तुस्थिती विचारात घेतली जात नाही. तसेच, पंचनाम्याची प्रक्रिया देखील संशयास्पदपणे जलदरित्या पूर्ण केली जात आहे, असे बियाणे उद्योगातील सूत्रांचे म्हणणे आहे.
soybean
soybean

पुणे: राज्यातील सोयाबीन बियाणे उगवणीबाबत कंपन्यांवर सरसकट कारवाई करण्यापूर्वी कृषी विभागाकडून वस्तुस्थिती विचारात घेतली जात नाही. तसेच, पंचनाम्याची प्रक्रिया देखील संशयास्पदपणे जलदरित्या पूर्ण केली जात आहे, असे बियाणे उद्योगातील सूत्रांचे म्हणणे आहे. 

निकृष्ट दर्जाचे बियाणे पुरविल्याचा ठपका ठेवत कृषी विभागाने फौजदारी गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केल्यामुळे बियाणे कंपन्या चिंतेत आहेत. विशेष म्हणजे काही नामांकित कंपन्यांवर देखील गुन्हे दाखल झालेले आहेत. ‘‘बियाणे विक्री व्यवसायात चुकीचे घटक शिरले आहेत हे मान्य आहे. मात्र, अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे देणाऱ्या कंपन्या स्वतःहून बदनामीकारक कृत्य करतील का? बियाणे न उगवण्यास जबाबदार ठरणाऱ्या इतर मुद्यांचा विचार का केला गेला नाही,’’ असे सवाल उपस्थित केले जात आहेत. 

बियाणे उगवणीमुळे तयार झालेल्या गोंधळाचा फायदा घेत काही ठिकाणी बियाणे कंपन्यांना धमकावले जात आहे. त्यातून आर्थिक फायदा करून घेण्याचा खटाटोप काही घटकांकडून होत असल्याचे बियाणे उद्योगाचे म्हणणे आहे. बियाणे व्यवस्थित हाताळणे, बीजप्रक्रिया, व्यवस्थित खोलीवर पेरणी, वाफसा, पाऊस कमी जास्त पडणे अशा विविध बाबी उगवणीला जबाबदार ठरतात. त्यामुळे कंपन्यांनी निकृष्ट बियाणे विकले असे सरसकट म्हणता येत नाही. एका गावात असलेल्या दोन तक्रारी पुढे २०० पर्यंत नेल्या जात आहेत. दिवसभरात फक्त १०-१५ पंचनामे करणे शक्य असताना शेकडो पंचनामे झाल्याचे कागदोपत्री दाखवले जात आहे, असे कंपन्यांच्या गोटातून सांगण्यात आले. 

कृषी खात्याकडून पंचनामे करताना अनेक ठिकाणी कंपन्यांना कळवलेले नाही. तसेच पंचनामे देखील चुकीच्या पद्धतीने सुरू आहेत. कंपन्यांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी न देणारी, चुकीच्या पद्धतीने सुरू असलेली ही कारवाई कायदेशीरदृष्ट्या टिकणार नाही. 

सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाण्याची तयारी  ओढूनताणून फौजदारी गुन्हे दाखल होत असल्याने न्यायालयात पुरावे सादर करताना कृषी विभागाची अडचण होईल. तसेच, या मुद्यांवर अगदी सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाण्याची तयारी आमची आहे, असे बियाणे कंपनीच्या एका संचालकाने स्पष्ट केले.  बियाणे कंपन्या म्हणतात... 

  • काही ठिकाणी बियाणे कंपन्यांना धमकावले जात आहे. त्यातून 
  • आर्थिक फायद्यासाठी काही घटकांकडून खटाटोप 
  • बियाणे व्यवस्थित हाताळणे, बीजप्रक्रिया, व्यवस्थित पेरणी, वाफसा, पाऊसही उगवणीला जबाबदार 
  • दिवसभरात शेकडो पंचनामे झाल्याचे दाखवले जात आहे 
  • कृषी खात्याकडून पंचनामे करताना अनेक ठिकाणी कंपन्यांना कळवलेले नाही 
  • पंचनामे चुकीच्या पद्धतीने सुरू 
  • कंपन्यांना म्हणणे मांडण्याची संधी दिली जात नाही   
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com