अमरावती ः मध्यम जमीन व सिंचनाच्या सोयी मर्यादित असलेल्या शेतकऱ्यांसाठी रब्बी ज्वारी हा उपयुक्त पर्याय ठरू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी जमिनीच्या वर्गवारीनुसार पिकाच्या निवडीवर रब्बी हंगामात भर देण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे यांनी केले आहे. मॉन्सूनोत्तर पाऊस ऑक्टोबर व त्यानंतर आता नोव्हेंबरमध्ये देखील काही भागांत झाला. त्यामुळे जमिनीत अतिरिक्त ओलावा निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांनी या ओलाव्याचा वापर करीत कमी पाण्यात येणारे रब्बी ज्वारीचे पीक घेतल्यास व एखादे संरक्षित सिंचन दिल्यास धान्य आणि कडबा अशा दुहेरी आणि हमखास उत्पन्नाची हमी शेतकऱ्यांना राहणार आहे. ज्या ठिकाणी संरक्षित सिंचन उपलब्ध नसेल, त्याच ठिकाणी धान्याचे उत्पादन कमी मिळाले तरी कडब्याच्या माध्यमातून जनावरांच्या वैरणाचा प्रश्न निश्चितपणे सोडविता येऊ शकतो. जिल्ह्यात पौष्टिक तृणधान्य योजनेअंतर्गत महाबीजमार्फत फुले सुचित्रा या रब्बी ज्वारी वाणाचे बियाणे अनुदानावर वितरणासाठी अधिकृत वितरकांमार्फत उपलब्ध होऊ शकेल. त्या अनुषंगाने रब्बी ज्वारी लागवड करण्यास इच्छुक शेतकऱ्यांनी गावातील कृषी सहायकाकडे आपली नावे नोंदवावी. नावे नोंदविल्यास त्या तालुक्यातील विक्री केंद्रावर बियाणे उपलब्ध करून देण्याबाबत महाबीजला सुध्दा सोईचे होईल, असेही विजय चवाळे यांनी सांगितले. सामूहिक क्षेत्रात धोके कमी वन्यप्राण्यांपासून होणाऱ्या त्रासाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी ज्वारी लागवडीस इच्छुक नसतात. मात्र, एखाद्या गावात क्लस्टरबेस हे पीक घेतल्यास वन्यप्राण्यापासून पीक संरक्षणाच्या एकत्रित उपाययोजना करणे शक्य होते. त्यामुळे एकट्या शेतकऱ्याने ज्वारीची पेरणी करण्यापेक्षा एकत्रितपणे पेरणीसाठी आपसात चर्चा करावी, असेही विजय चवाळे यांनी सांगितले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.