लातूर : लातूर कृषी विभागांतर्गत पाच जिल्ह्यांत खरिपात सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ९४ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली. मात्र, आता रब्बीत शेतकऱ्यांनी विविध पिकांच्या पेरणीस पसंती दिली आहे. सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत रब्बीची तब्बल १२१ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे.
परभणीचा अपवाद वगळता नांदेड, हिंगोली, उस्मानाबाद, लातूर या चारही जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत पुढे जाऊन पेरणी झाली आहे.
लातूर कृषी विभागांतर्गत नांदेड, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली व लातूर या पाच जिल्ह्यांत खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र २९ लाख १५ हजार २८० हेक्टर आहे. त्या तुलनेत ९४ टक्के क्षेत्रावर अर्थात २७ लाख १५ हजार २८० हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली होती. मात्र, नैसर्गिक संकटामुळे खरिपाची मोठी हानी झाली. त्यामुळे पाचही जिल्ह्यांतील शेतकऱ्यांची भिस्त रब्बीवर अवलंबून आहे.
या पाचही जिल्ह्यांत रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र ११ लाख १४ हजार २३० हेक्टर आहे. प्रत्यक्षात १२१ टक्के म्हणजे १३ लाख ४७ हजार २०१ हेक्टरवर पेरणी झाली. त्यात लातूर जिल्ह्यातील ३ लाख ३८ हजार ८६५ हेक्टरसह उस्मानाबाद जिल्ह्यातील ३ लाख ३३ हजार ८३१ हेक्टर, नांदेड २ लाख ६१ हजार ७०७ हेक्टर, परभणी २ लाख ५६ हजार १६४ हेक्टर, तर हिंगोली जिल्ह्यातील १ लाख ५६ हजार ६३४ हेक्टरवरील पिकांचा समावेश आहे.
तुरीची काढणी, कपाशीची वेचणी संपली
खरिपातील तुरीची काढणी व कपाशीची वेचणी जवळपास संपल्यात जमा आहे. कपाशीची काही ठिकाणी वेचणी अंतिम टप्प्यात असल्याची स्थिती आहे. खरिपातील पिकांवरील संकटांप्रमाणेच रब्बी पिकांनाही पोषक वातावरण आहे, असे नाही. गहू, हरभऱ्यासारख्या पिकांना आवश्यक तितकी थंडी नाही. त्यामुळे रब्बीतील ही पिके शेतकऱ्यांना किती साथ देतील? हा प्रश्न आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.